वन्यप्रेमींचा जीव कासावीस : पाण्याच्या शोधात प्राण्यांचा मृत्यू
वडगाव मावळ – मावळ तालुक्यात अन्न पाण्याच्या शोधात वन्य जीवांचा नागरी वस्तीत घुसल्याने तसेच रेल्वे आणि महामार्ग अपघातात मृत्यू होत आहे. वन्यजीवांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी वनविभाग असमर्थ ठरतोय, आणखी किती वन्यजीवांच्या बळींची प्रतीक्षा वनविभागाला असा सवाल वन्यजीव मित्रांनी केला आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील वने तसेच वन्यजीवांचे संवर्धन व संरक्षण करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.
रविवारी (दि. 3) लोणावळा जवळील ऍम्बी व्हॅलीमधील निसर्ग तलाव येथे शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात बिबट्याचा मृत्यू झाला. अन्न व पाण्याच्या शोधात रेल्वे मार्ग, द्रुतगती, महामार्ग तसेच राज्यमार्गावर वाहनांच्या धडकेत शेकडो वन्यजीवांचा बळी जात आहे. त्यांची नोंदही नसते. त्यातच नागरीवस्तीत प्रवेश करणाऱ्या वन्यजीवांवर कुत्र्यांची हल्ले होऊन वन्यजीवांचा मृत्यू होत आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेल्या मावळ तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्र वनविभागाचे असून, वडगाव वनपरिक्षेत्र व शिरोता वनपरिक्षेत्र असे कार्यालय आहे. या वनक्षेत्रात बिबट्या, गवा, सांबर, भेकर, हरिण, पिसोरा, मोर, कोल्हे, माकड, वानर, रानडुक्कर, ससे, मोर, लांडोर, गिधाड, घार, घुबड, अजगर, घोरपड, रानमांजर, खवले मांजर, सायाळ, रान कोंबडे आदी वन्यजीव पूर्वी बहुसंख्येने वास्तव्यास होते. यातच पुणे-मुंबई महामार्गाच्या मध्यवर्ती तसेच नैसर्गिक व भौतिक साधन संपत्तीने श्रीमंत असलेल्या मावळ तालुक्यातील जमिनीचे आकर्षण महाराष्ट्रासह देशातील नेते, अभिनेते, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, धनिक व अधिकारी आदींना असल्याने अनेकांनी जमिनी विकत घेतल्या आहेत.
या धनिकांनी वनक्षेत्राच्या हद्दीलगतच जमिनी खरेदी केल्या असून डोंगरदऱ्यात असलेल्या जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी वनक्षेत्राच्या हद्दीत अतिक्रमण तसेच वृक्षतोड मोठ्या प्रमाणवर केली आहे. तसेच सुट्ट्यांमध्ये त्यांची कुटुंबे तसेच मित्र परिवार राहण्यासाठी येतो. त्यांना येथील निसर्ग तसेच वन्यजीवांचे आवाज साद घालत असल्याने ते बिनधास्तपणे वन्यजीवांच्या शिकारी करतात. त्यातच येथील स्थानिक पैशाच्या हव्यासापोटी वन्यजीवांच्या शिकारी करतात. वनविभागाने त्यांच्या वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन केल्याचे दिसत नाही.
दरम्यान, पूर्वी मावळ तालुक्याचे नैसर्गिक वैभवच महाराष्ट्रासह देशातील नागरिकांना भुरळ पडत होते. वन व वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वनविभागाच्या हद्दींना संरक्षण कुंपणे उभारणे, वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची कायमची व्यवस्था करणे, वन्यजीवांच्या अन्नासाठी वनक्षेत्रात वनौषधी झाडांच्या वृक्षांचे रोपण करावे. वनक्षेत्रातील वाढत्या शिकारी रोखण्यासाठी वनक्षेत्रात छुपे सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, नैसर्गिक व मानव निर्मित वनवे विझवण्यासाठी अत्याधुनिक हेलिकॉप्टर उपलब्ध करावे. वनक्षेत्रातील वाढते अतिक्रमण रोखून मानवी हस्तक्षेप रोखावा. मावळ तालुक्यात वन पर्यटनस्थळे निर्माण होतील, त्यामुळे स्थानिकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील.
जनजागृती नावालाच
कोट्यवधींचा निधी वन व वन्यजीव संरक्षण व संवर्धनासाठी येत असून, त्या निधीतून केलेली कामे दिसतच नाही. अधिकारी व ठेकेदार परस्पर संगनमताने बिले काढून घेतात. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्षात वनक्षेत्रात नाममात्रच दिसतात. वन्यजीव सप्ताह, पर्यावरण दिन, वसुंधरा दिन आदी कार्यक्रमाबाबत जनजागृती नावालाच केली जाते. वनहक्क संरक्षण समित्या केवळ नावालाच असून, त्यांची प्रभावीपणे कार्य दिसत नाहीत.
मावळ तालुक्यात हजारो हेक्टर वनक्षेत्र असून त्यात काही घनदाट तर काही विरळ वनक्षेत्र आहे. वनक्षेत्रात दरवर्षी वन संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण केले जात आहे. वन्यजीवांच्या संवर्धनासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहेत. वनक्षेत्राच्या हद्दीतील नागरिकांनी सहकार्य केल्यास वन व वन्यजीव संरक्षण प्रभावीपणे राबविता येईल. वनक्षेत्राच्या हद्दी संरक्षित करून वणवे विझवण्यासाठी अत्याधुनिक साधने तसेच मुबलक मनुष्यबळ उपलब्ध होणे आवश्यक आहे.
– सोमनाथ ताकवले, वनपरिक्षेत्राधिकारी, वडगाव मावळ.