भुलेश्वर – महाराष्ट्रात जागृत देवस्थान तसेच पुणे जिल्ह्यात शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील भुलेश्वर मंदिर परिसरात शुकशुकाट आहे. लॉकडाऊनमुळे परिसरातील व्यावसायिकांना लाखो रूपयांचा फटका बसला आहे. दोन महिन्यांत येणारे 50 हजार भाविक घटले आहेत.
उदरनिर्वाह करणाऱ्या घटकांना झळ बसली आहे. ही रुंदावलेली आर्थिक दरी पुढील वर्षभर तरी मिटणार नाही, त्यामुळे व्यावसायिकांतून चिंता व्यक्त होत आहे. दरवर्षी येणारे परदेशी पर्यटक वर्षभर तरी येणार नाहीत. ही विदारकता भुलेश्वर परिसरात पाहावयास मिळत आहे.
भुलेश्वर येथे महिन्याला सरासरी 20 ते 25 हजार भाविक येत असतात. मात्र, लॉकडाऊनमुळे 2 महिन्यांत येणारे जवळपास 50 हजार भाविक न आल्याने मंदिराच्या पायथ्याला असणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना मात्र, लॉकडाऊनमुळे फटका बसला आहे. चहापाणी, नाष्टा, जेवण यासाठी पर्यटकांची वर्दळ आता बंद झाली आहे.
लॉकडाऊनच्या काळात भुलेश्वर महादेवाच्या चैत्री यात्रेचा सुद्धा मुहूर्त होता. दि. 6 व 7 एप्रिल रोजी ही चैत्री यात्रा असल्याने व यात्रांना बंदी असल्याने भुलेश्वराच्या डोंगरावर कोणी फिरकले नाहीत. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी लॉकडाऊनमुळे लाखो रुपयांची उलाढाल पूर्णपणे थांबल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
परदेशी पर्यटकांना दर्शनाची आस
पुणे व परिसरात आयटी क्षेत्र वाढत आहे. या क्षेत्रात सर्वेक्षणासाठी नेहमी परदेशी पाहुणे येत असतात. ऑफिसचे काम झाल्यानंतर पुण्याच्या परिसरात असणाऱ्या विविध ठिकाणांना भेट देतात. सरासरी दर महिन्याला 30 ते 50 परदेशी पर्यटक भुलेश्वर याठिकाणी भेट देतात. वर्षभरात सुमारे 360 परदेशी पर्यटक येत असतात. यापैकी काही पर्यटक भुलेश्वर महादेवाचे इतके निसीम भक्त आहेत. ते दर महिन्याला या ठिकाणी शिवलिंगावर रूद्राभिषेक करतात. मात्र, करोनामुळे परदेशी पर्यटकांना भुलेश्वराचे दर्शन होणार नाही, असे चित्र दिसत आहे.