नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी स्थलांतरित कामगार जबाबदार आहेत. तसेच धार्मिक कार्यक्रमांमुळेही त्याचा विस्तार झाला, असा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अर्थात आयसीएमआरने आपल्या एका संशोधनात केला आहे.
आयसीएमआरने म्हटले आहे की, देशात करोना विषाणू बी 1.1.7, आणि बी 1.351 चे तीन प्रकार आढळले आहेत. या प्रकारांबद्दलची परिस्थिती चिंताजनक होती. कारण ते रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता कमी करतात.
उत्तर भारतातील अनेक राज्यांतील लाखो कामगार देशाच्या महानगरांमध्ये नोकरी करतात. या कामगारांना करोना संकटामुळे लॉकडाऊनमध्ये रोजगाराच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ते लाखोंच्या संख्येने आपल्या राज्यात परत जातात. मजुरांबरोबरच करोनाचा संसर्गही या राज्यात पोहोचण्याची शक्यता असते.
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. देशात गेल्या महिनाभरापासून दररोज चार हजारांच्या आसपास करोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. मात्र बुधवारी ही संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे.