तळेगावातील नागरिक कासावीस
तळेगाव ढमढेरे – उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असताना पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असताना दुसरीकडे नागरिक पाणीटंचाईंने त्रस्त झाले आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करावा लागत आहे.
तळेगाव ढमढेरे गावाला पाणीटंचाईची चाहूल लागली असून मे महिना सुरु होण्याच्या आधीच शेतीला, घरगुती वापरासाठी पाण्याचा तुटवडा आला आहे. तळेगाव ढमढेरे परिसरात उसाची शेती मोठया प्रमाणावर असल्याने उन्हाळ्यात उस शेतीला वेळेवर पाण्याचे आवर्तन जाणे गरजेचे असते. ऊस शेतीबरोबर दुग्धव्यवसाय देखील मोठ्या या भागात प्रमाणात केला जातो.
पाण्याचा साठा दिवसेंदिवस कमी होत चालल्याने शेतकऱ्यांनी वार्षिक पीक असणाऱ्या उसाची शेती कमी करून दुग्ध व्यवसायकडे वळत असल्याचे दिसून येते. परंतु एप्रिल महिन्यातच विहिरी, कुपनलिका यांनी पाण्याचा तळ गाठल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. त्यात कडक उन्हाचा तडाका असल्याने सुपीक मातीचा पाणी जास्त शोषून घेत आहे. त्यामुळे वेळ नदीला पुन्हा पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी नागरिक करीत आहेत.