पाच गावांचा पाणीप्रश्न गंभीर
सविंदणे : आमदाबाद (ता. शिरूर) परिसरातील घोडनदी कोरडी पडल्याने पाणी नाही. त्यामुळे शेती पंप बंद झाले आहेत. पाच गावांचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नदीला लवकर पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आमदाबाद येथे नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधलेला असून यामधून परिसरातील शेतकऱ्यांनी उपसा सिंचन योजना करून शेती फुलविली आहे. बंधाऱ्यावरून आमदाबादबरोबर डोंगरगण, तामखरवाडी, मलठण, निमगाव भोगी, परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते.
बंधाऱ्यांचे ढापे व्यवस्थित न बसल्यामुळे यामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाली होती. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून बंधारा कोरडा पडला असून शेती पंप बंद झालेले आहेत. त्याचा फटका शेतीमालाला बसला आहे. फळ-भाजीपाला, पिके पाण्याअभावी सुकून चालले आहेत.
लवकर पाणी न आल्याने या नदीवरून अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या उपसा सिंचन योजनेलाही फटका बसणार आहे. डिंभे धरणामधून त्वरित पाणी सोडून बंधारे भरून देण्यात यावा, अशी मागणी सरपंच सोनाली थोरात, उपसरपंच प्रदीप साळवे, माजी सरपंच योगेश थोरात, माजी चेअरमन अशोक माशेरे यांनी केली आहे.