मुंबई – राज्यात करोनामुळे नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना ठाकरे सरकारने पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर 2020 पर्यंत राज्य पोलीस दलांमध्ये विविध पदांवर 12 हजार 538 कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर दिली आहे.
या संदर्भात अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह घेतलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या वर्षअखेरपर्यंत पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
राज्यात फेब्रुवारी 2018 मध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये 3400 जागांसाठी भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती. मात्र, भरती प्रक्रिया राबवली गेली नव्हती. मार्च महिन्यात करोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे सत्र सुरू ठेवल्यामुळे या भरतीचा निर्णय लांबणीवर पडत होता. आता करोनाचा प्रादुर्भाव असतानाही गृहमंत्र्यांनी भरती घेण्यासाठी पावले उचलली आहेत.