जयपूर – कॉंग्रेसमधील सत्तासंघर्षामुळे राजस्थानात काही दिवसांपासून राजकीय उलथापालथी सुरू आहेत. त्याबाबत माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा वसुंधरा राजे यांनी शनिवारी मौन सोडले. कॉंग्रेसमधील बेबनावामुळे राजस्थानच्या जनतेला नुकसान सोसावे लागत असल्याची बाब दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.
सध्या राजस्थानमधील करोना संकट तीव्र बनले आहे. शेतकऱ्यांना सातत्याने येणाऱ्या टोळधाडीच्या समस्येने ग्रासले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्यभरात वीजेची समस्या आहे. अशावेळी सरकारसाठी केवळ जनतेचे हित सर्वोच्च स्थानी असायला हवे. कधीतरी जनतेचा विचार करा, अशा शब्दांत राजे यांनी राजस्थानमधील सत्तारूढ कॉंग्रेसवर ट्विटरवरून शाब्दिक हल्लाबोल केला.
भाजप आणि भाजपच्या नेतृत्वावर खापर फोडण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. राजस्थानात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना काही दिवस राजे यांच्याकडून कुठलीच प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.
अशातच भाजपच्या एका मित्रपक्षाचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी राजे यांच्यावर केलेल्या एका आरोपामुळे सनसनाटी निर्माण झाली. गेहलोत सरकार वाचवण्याचा प्रयत्न राजे करत असल्याचा आरोप बेनिवाल यांनी केला. त्यापार्श्वभूमीवर, राजे यांनी प्रतिक्रिया देण्याला महत्व आहे.