नवी दिल्ली ; देशांत गेल्या 24 तासांत नवे करोनाबाधित 34 हजार 884 सापडले. 30 हजाराचा टप्पा पार करण्याचा हा सलग तिसरा दिवस होता. त्यामुळे देशातील एकूण बाधितांची संख्या दहा लाख 38 हजार 716वर पोहोचली आहे. सहा लाख 53 हजार 750 बाधित ठणठणीत झाले आहेत. तर करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 26 हजार 273 वर गेली आहे.
एका दिवसांत सर्वाधिक म्हणजे 671 जण मरण पावले. दरम्यान, तज्ज्ञांच्या अनुमानानुसार 11 ऑगस्टपूर्वी देशांतील बाधितांची संख्या 20 लाखांचा टप्पा ओलांडेल. सध्या देशात तीन लाख 58 हजार 592 सक्रिय बाधित आहेत. तर 62.94 टक्के बाधित पूर्णत: बरे झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केल आहे.
मात्र, पुढील दहा लाख बाधितांचा टप्पा येत्या तीन आठवड्यात गाठला जाण्याची शक्यता आहे, असे भाकित आरोग्य अर्थतज्ज्ञ रिजो एम. जॉन यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या अंदाजानुसार भारत 20 लाख बाधितांचा टप्पा 10-11 ऑगस्ट रोजी ओलांडेल. तर 30 लाख बाधितांचा टप्पा 28-29 ऑगस्ट रोजी ओलांडेल. 31 ऑगस्टला भारतात 32 लाख बाधित असतील. वाढीचा वेग लक्षात घेऊन हे अनुमान काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारतात 22 जुलैच्या सुमारास 10 लाख बाधित असतील असा अंदाज त्यांनी 8 जून रोजी मांडला होता. भारताने ही संख्या 16 जुलैला ओलांडली. भारतीय वैद्यकीय परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, एक कोटी 34 लाख 33 हजार 742 चाचण्या 17 जुलैला पूर्ण केल्या. शुक्रवारी (दि. 17) एका दिवसांत देशांत तीन लाख 61 हजार 24 चाचण्या घेण्यात आल्या.
गेल्या 24 तासांत मरण पावलेल्या 671 जणांमध्ये महाराष्ट्रात 258, कर्नाटकात 115 तमिळनाडूत 79 तर आंध्रात 42 जणांचा समावेश आहे. देशातील करोनामुळे मृतांत सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले असून शुक्रवारपर्यंत त्यांची संख्या 11 हजार 452 होती. या आजाराच्या योग्य व्यवस्थापनामुळे रुग्णालयात उपचार फार कमी जणांवर करावे लागले. मे आणि जूनच्या तुलनेत त्यात खूपच कपात झाली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक बाधित
महाराष्ट्रात सर्वाधिक दोन लाख 92 हजार 589 बाधित आढळले आहेत. तमिळनाडूत एक लाख 60 हजार बाधित असून दिल्लीत एक लाख 20 हजार 107 तर कर्नाटकांत 55 हजार 115 बाधित आहेत.