चंद्रपूर – राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी ही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यास अयशस्वी ठरले. अशामध्ये आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजप आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे.
भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा महाविकास आघाडीने फिक्स केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांची चंद्रपूरमध्ये पत्रकार परिषद झाली. याप्रसंगी त्यांनी भाजप व काँग्रेस पक्षावर टीका केली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेसचे उमेदवार पळकुटे आहेत. शरद पवार व उध्दव ठाकरे यांना लोकसभेसाठी उमेदवार मिळत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भाजपचे की काँग्रेसचे हे कळायला मार्ग नाही तर भाजप हा फोडाफोडीचे राजकारण करीत आहे.
यावेळी प्रकाश आंबेडकरांनी भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा महाविकास आघाडीने फिक्स केल्याचा गंभीर आरोप केला. कल्याण, बीड, बुलडाणा अशा काही जागांची नावं घेत त्यांनी या जागा फिक्स असल्याचे सांगितले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.