पिंपरी (प्रतिनिधी) – गेले दोन वर्षे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सहवासात पंढरपूरच्या आषाढी पायी वारी सोहळ्याला जाऊ न शकलेले माऊलींचे मानाचे “हिरा’ आणि “मोती’ हे अश्व यंदाच्या सोहळ्यासाठी आळंदीच्या वाटेला लागले आहेत. कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील अंकलीहून 10 जून रोजी निघालेले हे अश्व आज (दि. 13) सातारा जिल्ह्यातील वहागाव येथे मुक्कामी असतील. 18 जून रोजी हे अश्व पुण्यात दाखल होणार आहेत.
गेल्या 189 वर्षाच्या परंपरेनुसार कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अंकलीतील शितोळे सरकारांकडे आळंदीच्या माऊलींच्या पालखीच्या अश्वांचा मान आहे. पालखीपूर्वी 12 दिवस आधी म्हणजेच 10 जूनला दोन्ही अश्वांचे सकाळी 9 वाजता प्रस्थान झाले. यावेळी अंकली संस्थानचे प्रमुख ऊर्जितसिंहराजे शितोळे सरकार आणि महादजीराजे शितोळे सरकार यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. मिरज, पेठ नाका सातारामार्गे हे अश्व शनिवारी (दि. 18 जून) सायंकाळी पुण्यात मुक्कामासाठी येतील. एक दिवस त्यांचा मुक्काम पुण्यातील रास्ते वाड्यात असेल. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अश्व सोमवारी (दि. 20) आळंदीकडे रवाना होणार आहेत.
अंकली ते आळंदी हा सुमारे 315 किलोमीटरचा प्रवास अश्वांसह स्वार आणि त्यांचे पथक यांचा पायी असतो. रोज साधारण 30 किलोमीटरचा प्रवासाचा टप्पा पूर्ण केला जातो. पालखी सोबत असलेल्या दोन अश्वांपैकी एक स्वाराचा आणि दुसरा माऊलींचा असतो. स्वारांच्या अश्वावरील तुकाराम कोळी वयाच्या 15 व्या वर्षांपासून वारीला जात आहेत. सलग 24 वर्षे त्यांना हा मान मिळत आहे. तीन उभ्या आणि चार गोल रिंगणात त्यांचे कौशल्य दिसून येते.
अश्वांच्या प्रस्थानाच्या वेळी अंकलीतील विठ्ठल मंदिरात परंपरेनुसार दिंडी निघाली. माउलींच्या घोडेस्वाराकडे यानंतर परंपरेनुसार जरीपटका सपूर्द करण्यात आला आणि अश्वांची दिंडीसह ग्रामप्रदक्षिणा झाल्यावर गावाच्या वेशीवरून त्यांना उत्साहात आणि हरिनामाच्या गजरात निरोप देण्यात आला. स्वाराचा जरीपटका आणि माउलींच्या अश्वाची गादी या दोन्ही गोष्टी स्वारांबरोबर आहे.