नवी दिल्ली , वृत्तसंस्था : केंद्रातील मोदी सरकारवर बेरोजगारीवरून विरोधकांकडून टीकांचा भडीमार केला जातो. मात्र मोदी सरकार रोजगाराच्या बाबतीत ऍक्शन मोड मध्ये आले असून येत्या दीड वर्षात तब्बल 10 लाख जणांना नोकऱ्या मिळणार आहेत. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट करीत देण्यात आली आहे. यासंबंधिचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. सरकारी नोकरभरती कधी होणार? याकडे सर्व बेरोजगार तरुणांचे लक्ष लागले असताना त्यांना ही बातमी दिलासा देणारी आहे.
PM @narendramodi reviewed the status of Human Resources in all departments and ministries and instructed that recruitment of 10 lakh people be done by the Government in mission mode in next 1.5 years.
— PMO India (@PMOIndia) June 14, 2022
मिळालेल्या माहितीनुसार यासंदर्भात मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक होणार आहे. या बैठकीत नोकरभरतीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा आणि त्यासोबत निर्णयही जाहीर होण्याची शक्यता आहे. नोकरभरतीसाठी केंद्र सरकारकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. मिशन मोड राबवण्यासाठी केंद्र सरकार विशेष पावलं उचलण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभागांमध्ये काम करणाऱ्यांच्या संख्याबळाचा आढावा घेतला. त्यानंतर सर्वच खात्यातील मंत्रालयांना आणि विभागांना पदभरती करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. पीएमओ इंडियाकडून ही माहिती देण्यात आली आहे. तसेच कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षात पदभरती करण्यात आली नव्हती. केंद्र सरकारमध्ये हजारो पदे रिक्त असून ही पदभरती केव्हा केली जाणार असा सवाल वारंवार उपस्थित केला जात होता. त्यामुळे अखेर याबाबत केंद्र सरकार कडून दिलासादायक बातमी आली आहे.