प्रीतम पुरोहित/ ज्ञानेश्वर फड – बरड, दि. 3 – वारीच्या काळात पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होत असतं. पूर्वी गावात पालखी येणार म्हणून जोरदार स्वागत केले जायचे, आजही होते. मात्र, वारकरी पुढील मुक्कामी गेल्यावर आधीच्या मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्राणावर अस्वच्छतां होत असे. मात्र, निर्मल वारीमुळे आता वारी काळात गावाचे आरोग्य सुधारण्यास मदत होत आहे, असे बरड गावचा स्वयंसेवक दत्ता थाठे सांगतात.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात 1000 फिरते स्वच्छतागृह तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात 800 स्वच्छतागृह आहेत. दररोज,हजारो वारकरी याचा वापर करीत आहे, त्यांच्यात जाऊन आम्ही जनजागृती करतो. मागील वेळी जेथे स्वच्छतागृह होते तेथे आता आहेत का? असे जेव्हा वारकरी विचारतात तेव्हा मोठा आनंद होतो. आपल्या कामाचे फलित झाले आहे, असे मी मानतो, असे सातारा जिल्ह्यातील समन्वयक राजेंद्र माने सांगतात.
आळंदी ते पंढरपूर अणि देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावर फिरते स्वच्छतागृह बसविण्याचे काम करते. एक मुक्काम झाल्यानंतर मागील मुक्कामाचे स्वच्छतागृह पुढील गावी बसवतात. जवळ पास दोन ते अडीच किमी परिसरात 800 स्वच्छतागृह बसवतात.
आसपासच्या भागांमध्ये वारकऱ्यांची निवासी व्यवस्था होते. वारकरी आपापल्या दिंडीत राहण्यासाठी तंबू आणि जेवणाची सोय करतात. मात्र, प्रात:विधीसाठी मोकळ्या जागांचा वापर करतात. त्यामुळे गैरसोय तर होतेच पण अस्वच्छता, आरोग्याच्या तक्रारी अशा अनेक गोष्टी सुद्धा उद्भवतात. यावर उपाय म्हणून पालखी मार्गावर “निर्मल वारी अभियानांतर्गत’ तात्पुरत्या स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करून दिली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत या फिरत्या स्वच्छतागृहातून जमा झालेल्या काही लाख लिटर मैला आदीची शास्त्रीयदृष्ट्या विल्हेवाट लावण्यात येते. या उपक्रमाद्वारे वारी खऱ्या अर्थाने निर्मल होण्यास मदत होते.
अनेक संघटनांच्या माध्यमातून विविध वयोगटातील, प्रोफेशन्समधील व्यक्ती या उपक्रमाशी जोडल्या आहेत. यांच्यात मधला दुवा म्हणजे संतोष दाभाडे. यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील स्वयंम सेवकांचे काम कसे असणार आहे? ते कोठे करणार आहेत? त्यांची वेळ काय असणार आहे? हे सगळं नियोजित केले जाते.
माऊलींच्या गटात गप्पांमधून होणारं प्रबोधन, निखळ भक्ती, पांडुरंग दर्शनाची ओढ, मुखी अखंड विठ्ठलनाम असं सहज आणि जवळून अनुभवणे हे अनोखेचे ठरते. अगदी सहजतेने सेवा करण्याची विठूमाऊलीने दिलेली संधी सुद्धा अवर्णनीयच. हे कार्य खूप मोठं आहे. हजारो जण यासाठी काम करत आहेत. मात्र, प्रत्येकाने खारीचा वाटा उचलणं हीच आपल्या परीने केलेली छोटीशी भक्ती असं वाटतं. एक श्लोक यात आवर्जून लिहावासा वाटतो…
जगी रक्षिणे राष्ट्र ही दिव्य ठेव,
असे ईश्वरी कार्य हे एकमेव
तुम्हा सहाय्य द्याया
असे ईश मागे,
चला व्हा खडे, व्हा खडे, सज्ज जागे!
निर्मल वारीने काय साध्य झालं…
मुख्य म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी फिरते स्वच्छतागृह याचा वापर वाढला. आम्ही पाल, दिंडी, पालखी तळ, गावागावातून प्रबोधन करू लागलो, त्याचा परिणाम गावात कोठे इतरत्र विधी साठी बसणारे वारकरी स्वच्छतागृहाचा वापर करू लागले. त्यामुळे गावातील होणारी दुर्गंधी कमी झाली, दूषित होण्याचे प्रमाण कमी झाले… त्यामुळे वारीनंतर गावातील माणसांचे आजारी पडण्याचे प्रमाण खूप कमी झाले. वारी काळात लोक आपल्याच गावी राहू लागले.
गावकऱ्यांचा प्रतिसाद आवश्यक…
निर्मल वारी 2014 पासून काम करत आहे. पालखी मार्गावर काम करताना अनेक छोटी-छोटी गावे लागतात. या गावातील तरुण पुढे येत आहेत. त्यांच्यामुळे नियोजन लवकर अणि व्यवस्थित करता येते. प्रशासन, आरोग्य विभाग आहेच. यामध्ये गावातील व्यक्तींनी किंवा प्रमुख व्यक्तींनी सुरुवातिला किमान आपल्या गावापुरता स्वइच्छेने पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून निम्यापेक्षा जास्त प्रमाणात निर्मल वारीचा फरक जाणवेल. आता, जवळपास काही गावात 70% तर इतर ठिकाणी 4050% फरक जाणवतो.