पुणे : आरती गाढवे
आज माऊलींच्या पालखीचं आळंदीतून प्रस्थान होतं आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे , डोळ्यांतले भाव पाहिले की जाणवतं या वर्षीचा उत्साह हा फार अनोखा आहे.अवघ्या महाराष्ट्रासाठी हा क्षण भारावणारा आहे. तब्बल दोन वर्षांनी इतकं मनमुराद नाचताना पाहिलं आहे या माणसांना…
ओव्या गाऊ बैसुनी तू येरे बा विठ्ठला…
असाच कानावर आवाज पडला “ओव्या गाऊ बैसुनी तू येरे बा विठ्ठला…!”जात्यावरच्या ओव्याही इतक्या नाचत डोक्यावर घेतल्या आहे या संप्रदायाने याचं फार अप्रूप वाटतं नेहमी आणि रमलं मन त्या ओव्यांत. या ओव्या रचनं हेच मला “ती”च्या आयुष्यातल्या क्रांतीचं पहिलं पाऊल वाटतं.आपल्या आराध्यालाच आपल्याकडे बोलावून घ्यायचं सामर्थ्य आहे या काव्य परंपरेत. या बायकांनी इतकी धाडसी पावलं उचलली आहेत की आजही हे काव्य स्वातंत्र्याची आनंदाची वाट दाखवत राहतं.
संत साहित्य दोन्ही काळांसोबत …
माऊलींचं प्रस्थान होतं आहे हे खरं पण माऊलींच्या आयुष्यातही असणारं “ती”च्या ओवीचं अनन्यसाधारण महत्त्व राहून राहून आठवत आहे.मुक्ताईची ओवी त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं आत्मिक शांतता देणारी होती.त्या संवादामुळेच नंतर बरंच काही घडलं.फक्त माऊलींसोबतच नाही तर अगदी आजही आपल्यासोबत ती ओवी संवाद साधतेच आहे.इतकं काय नावीन्य आहे या रचनेत की इतक्या शतकांनंतरही आपल्या मनात घर करतात ते शब्द.आपल्या आधीची पिढी आणि नंतरची पिढी दोन्हींना वाट दाखवतात. आपली आजची पिढी आणि भक्ती असा विचार केला तर बऱ्याच अर्थानं बदल दिसतो. तरिही हे संत साहित्य सांगड घालून देतं दोन्ही काळांसोबत.
जेव्हा माउली रागावले होते…
अगदी जागतिक पातळीवर भेडसावणारे शांतीचे आणि प्रेमाचे प्रश्न अभ्यासतानाही आठवतात या ओव्या. वैश्विक ते वैयक्तिक सगळ्याच पातळीवर सुचतात ओव्या. जगाला पसायदान सांगणारे माऊलीही कधीकाळी रागावले होते जगावरच. त्यांना धाकट्या मुक्ताईने केवढ्या समजूतीने ‘राग’ बाजुला ठेवा सांगितलं होतं. ते ताटीचे अभंग फार खोलवर बोलतात आपल्यासोबतही.
वेळ क्रोधाचा उगवला | अवघा योग फोल झाला ||
ऐसी थोर दृष्टी धरा |
ताटी उघडा ज्ञानेश्वरा || असे ज्ञानेश्वरांना मिक्ताईंनी सांगितले होते. अचानक असं वाटतं की मुक्ताई प्रत्येकाला भेटणं किती आवश्यक आहे …म्हणजे बघा..
आपआपणा शोधूनि घ्यावे | विवेक नांदे त्याच्या सवे ||
आशा दंभ अवघे आवरा |
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||
आपण सर्वात आधी स्वतःचा शोध घेणं गरजेचं आहे. किंवा आपल्यातला दंभ बाजुला सारल्यावरच तिथे विवेक नांदतो असं त्या म्हणतात.
योगी पावन मनाचा |साहे अपराध जनाचा ||
विश्व रागे झाले वन्ही |संती सुखे व्हावे पाणी||
शब्दशस्त्रे झाले क्लेश | संती मानावा उपदेश ||
विश्वपट ब्रम्हदोरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||
ह्या ओव्यांपाशी येऊन मन अगदी शांत थांबतं. सुखसागर आपण व्हावे. पुढे बघा किती छान आहे हे की,
जीव जीवासी पैं द्यावा | मग करू नये हेवा ||
तरणोपाय चित्ती धरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||
इतकं सहज सुंदर आहे हे… आणि तितकंच गहनही आहे…
आजच्या काळात असे असंख्य क्षण आपल्या भोवती घडत आहे जिथे आपल्याला आपला आपपर भाव बाजूला ठेवून जगायला हवं आहे . आणि जीवाला जीव द्यायला हवा आहे. हे शब्द पावलोपावली साद घालतात. मुक्ताबाई आणि त्यांच्या काळातील सामाजिक व्यवस्था पाहता त्यांचं व्यक्त होणं हे पराकोटीचं धाडसी आहे. तिन्ही भावंडांपेक्षा धाकटं असूनही त्यांचा ज्ञानाचा अधिकार हा त्या भावंडांनीही ज्या प्रकारे स्वीकारला आहे. ते ” स्विकारणं ” आपल्या पिढीला मार्ग दाखवत राहतं. स्त्री संतांच्या काव्यातलं भावविश्व अभ्यासणं म्हणजे फक्त त्या काळातल्या व्यक्त होण्याची प्रक्रिया अभ्यासणं नाहीये. तर अजून कित्येक पिढ्या या गोष्टीतला आशय घेऊन संपन्न होतील अशी खात्री आहे. त्यामुळे या ओव्या गात राहू… आनंद वाटत राहू……!