ऐन तोडणीच्यावेळी प्रकार : लाखो रुपयांचे नुकसान
मांडवगण फराटा – आंधळगाव (ता. शिरूर) येथील शेतकरी स्वप्निल खरात यांच्या शेतातील र्टामॅटोची बागच मध्यरात्रीच्या सुमारास समाजकंटक माथेफिरूकडून उपटून टाकली आहे. त्यामुळे खरात कुटुंबीय उघड्यावर पडले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांतून संतापाची लाट उसळली आहे.
आंधळगाव येथील तरुण शेतकरी स्वप्निल खरात यांनी दोन महिन्यांपूर्वीं आपल्या 30 गुंठे शेतात टॉमॅटोची लागवड केली होती. नुकतेच टॉमेटोच्या तोडणीला सुरुवात झाली होती. परंतू काही अज्ञात समाजकंटकांनी रात्रीच्या वेळी 20 गुंठे क्षेत्रातील उभे टॉमॅटोचे पिकंच उपटून टाकले आहे. त्यामुळे खरात यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आम्ही शेतात कष्ट करुन खाणारी माणसे आहोत. यासाठी केलेल्या खर्चाची उधारी देखील दिलेली नाही. त्यातच कोणाशी कसले मतभेद नसताना आमच्या टोमॅटोचे नुकसान केले आहे. हे सांगताना पारुबाई खरात यांना अश्रू अनावर झाले.
आधीच नैसर्गिक संकटांनी पिचलेला बळीराजा शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे. आपल्या शेतात काबाडकष्ट करून कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करत असताना समाजातील काही समाजकंटकांकडून असे दुर्दैवी प्रकार केले जात आहेत. यापुढे शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांला पडला आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये खरात यांनी तक्रार दाखल केली आहे. शिरूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तिच्याविरोधात गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध घेत आहेत.