मुंबई/पुणे : मुंबई आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी करोनाचा सामुहिक संसर्ग झाल्याचे काही पुरावे मिळत आहेत. मात्र महाराष्ट्राचे एकूण चित्र हे करोना नियंत्रित असल्याचे आहे, असे राज्याचे साथीचे आजार सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.
मुंबई आणि महाराष्ट्रात विशिष्ट क्षेत्रात करोनाचा फैलाव झाल्याचे दिसत आहे. केवळ मुंबईच नव्हे तर राज्याच्या अनय काही भागातही सामुहिक संसर्ग झाल्याचे काही पुरावे मिळत आहेत. मात्र, राज्याचे एकूण चित्र हे करोना नियंत्रणात असल्याचे आहे, असे आवटे म्हणाले. हिंदुस्तान टाईम्सच्या संकेत स्थळाने हे वृत्त दिले आहे.
मुंबईतील करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबाबत भाष्य करताना ते म्हणाले, देशाचा अन्य भाग आणि मुंबई यांची स्थिती काहीशी वेगळी आहे. हे शहर लोकसंख्येच्या अतीघनतेचे आहे. या शहराला सामाजिक – आर्थिक महत्व आहे. हे शहर केवळ माहाराष्ट्राची राजधानी आहे, असे नव्हे. तर, देशातील अनेक महानगरापेक्षा या शहराचे सामाजिक-आर्थिक स्थान वेगळे आहे. येथील लोकसंख्येची घनता प्रतीचौरस किमी 20 हजार लोकांपेक्षा अधिक आहे. मुंबईत करोनाचे बाधित आढळण्याचे हे प्रमुख कारण आहे, असेही डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले.
सामुहिक संसर्गाचा विचार करताना प्रत्येक रुग्णाचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. त्यांचा प्रवासाचा इतिहास, त्यांच्या संसर्गाचे स्थान आणि अशा आशयाची सर्व माहिती संकलीत करावी लागेल, असे ते म्हणाले.