मुंबई – बॉलीवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानचे आयुष शर्मासोबत 2014 मध्ये लग्न झाले होते. मात्र अर्पितासोबत लग्न केल्यानंतर आयुषला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. पैसे कमावण्यासाठी आणि अभिनेता होण्यासाठी त्याने अर्पितासोबत लग्न केल्याचे म्हणत अनेकांनी त्याच्यावर टीका केली. मात्र या सगळ्याला आयुष शर्माने सडेतोड उत्तर दिले आहे.
एका मुलाखतीत आयुष म्हणाला की, “अर्पिता एक मजबूत आणि आत्मविश्वासू महिला आहे. तिच्यासारखा जोडीदार मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. ती जशी आहे तशी ती स्वतःला स्वीकारते. अनेक लोक म्हणतात की, मी पैशासाठी आणि अभिनेता बनण्यासाठी तिच्याशी लग्न केले. पण मी त्याच्यावर प्रेम करतो म्हणून तिच्याशी लग्न केले. अर्पिता आणि आमच्या कुटुंबाला हे माहित आहे.”
पुढे तो म्हणाला, “लग्नात सलमान खानने मला रोल्स रॉइस गिफ्ट केल्याचेही मी अनेक ठिकाणी वाचले आहे. पण हे खोटे आहे. ट्रोलर्स मला आणि अर्पिताला काहीही म्हणत असले तरी ट्रोलिंगमुळे माझ्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही,” असेही आयुष शर्माने म्हंटले आहे.
दरम्यान, आयुष शर्माचे 18 नोव्हेंबर 2014 रोजी अर्पिताशी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. अर्पिताशी लग्न झाल्यानंतर चार वर्षांनी आयुषने ‘लवयात्री’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर आयुषने सलमान खानसोबत ‘अंतिम’ चित्रपटात काम केले. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता.