Maratha Resrvation : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटेच राज्य सरकारकडून त्याचे अध्यादेश काढण्यात आले आहेत. अशात आज सकाळी १० च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. या मोठ्या यशानंतर मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे यांच्या कुटूंबीयांचादेखील सिंहाचा वाटा आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सग्यासोयऱ्यांच्या मुद्यांवर अडलेला होता मात्र सरकारने काढलेल्या नव्या अध्यादेशात मराठ्यांच्या सग्या सोयऱ्यांनाही आरक्षण मिळणार असल्याचे नमुद करण्यात आले आहे.आता त्यांच्या याच लढ्याला आज यश मिळले आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या कुटुंबात आनंदाला उधाण आले आहे.
मनोज जरांगे यांच्या परिवारासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. समाजासाठी लढणाऱ्या त्यांच्या वडीलांबद्दल बोलताना जरांगे यांची मुलं अतिशय भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आपले पती घरी आले नसुन ते समाजासाठी लढत असल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटील यांच्या पत्नीने दिली आहे. तसेच ‘आम्ही पप्पांचे स्वागत मोठ्या थाटामाटात करू’ असेही त्यांच्या मुलांनी म्हटले.
मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला अखेर आज यश आलं आहे. या सगळ्यात त्यांच्या कुटूंबीयांचा त्याग हा अत्यंत महत्त्वाचा ठरला. आता आरक्षण मिळालं आहे, त्यामुळे आपल्या वडीलांनी घरी यावं अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांच्या कुटूंबीयांनी दिली आहे. या यशाचे श्रेय आपले वडील आणि मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मराठा आंदेलकांना जातं अशी प्रतिक्रीया मनोज जरांगे यांच्या मुलीने दिली आहे.