Manoj Jarange : राज्यात मराठा समाजाच्या (maratha reservation) मागणीच्या आंदोलनाने आक्रमक स्वरूप धारण केले आहे. कारण एका महिन्याची मुदत देऊनही सरकारकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही तोडगा काढता आला नाही त्यामुळे पुन्हा एकदा या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील हे बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत.
त्यांच्या उपोषणाचा आजचा 9 वा दिवस आहे. त्यांची प्रकृती खूपच खालावली असून आता तर त्यांना धड उभही राहता येत नाहीय. जालन्याच्या अंतरावाली-सराटी गावात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचा आमरण उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अन्न-पाणी सोडलय. त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झालाय.
त्यामुळे आता यांच्या प्रकृतीची काळजी त्यांच्या कुटुंबियांनाही वाटत आहे. मनोज जरांगे पाटील यांची कन्या पल्लवी (Pallavi Jarange Patil) हिने वडिलांना काही झाले तर राज्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना मारीन, अशी थेट धमकीच दिली आहे. सर्व पुरावे मराठवाड्यात असताना समितीचे काय काम? असा सवालही उपस्थित केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत पल्लवी बोलत होती.
यावेळी बोलताना पल्लवी (Pallavi Jarange Patil) म्हणाली की, “मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत 49 जणांचा बळी गेला आहे. मग काय माझ्या वडिलांचा जीव गेल्यावर आरक्षण देणार आहात का? माझ्या वडिलांना काही झाले तर या सरकारला जागेवर ठेवणार नाही. अख्खा मराठा समाज सोबत घेऊन राज्यकर्त्यांच्या घरात शिरुन त्यांना मारीन. एवढी हिंमत माझ्यात त्यांची मुलगी म्हणून आहे.
मराठा, कुणबीसंदर्भातील सर्व पुरावे मराठवाड्यात आहे. मग या समितीचे काय काम? यापूर्वी सरकारने 30 दिवस मागितले होते. परंतु माझ्या वडिलांनी 40 दिवस दिले. त्या दिवसांत सरकारने काय केले? आता पुन्हा कशासाठी मुदत हवी आहे. आता काही कारणे देऊ नका, सरळ आरक्षण द्या..! अशी मागणी पल्लवी हिने केली आहे.