पळसदेव -उजनी धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उजनीच्या पाण्यावर हिरवा रंगाचा तवंग येत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे उजनीतील दूषित पाणी नागरिक, जनावरांच्या जीवावर बेतत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.उजनीच्या पाण्यात पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडल्यामुळे उजनी धरणात मिसळत आहे. त्यामुळे धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे.
शिवाय केमिकल कंपनीमधून निघणारे दूषित रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जात आहे. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे योग्य नियंत्रण नसल्याने नदीच्या पाण्यात विषारी रसायने पाहावयास मिळत आहेत. दूषित पाणी पिल्यामुळे उजनी काठावरील जनावरे, नागरिकांना विविध आजार होत आहेत. अनेकांना त्वचेचे विकार, पोटदुखी, मुतखडा यांसारखे आजार असणारे शेकडो रुग्ण दवाखान्यात हेलपाटे मारत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. उजनी काठावरील गावात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहेत.
पोटाचा, हाडाचा तसेच पित्ताशयाचा कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहे. भीमा नदीत येणारे पुणे, पिंपरी – चिंचवड येथील सांडपाणी तातडीने बंद करावे व अन्यथा सांडपाणी प्राक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यन्वित करण्याची मागणी येथील नागरिकांमधून होत आहे. अगदी शेताला पाणी देण्यासाठी ड्रीप केली तर ती काही दिवसातच बंद पडत आहे.
बसवलेला फिल्टर पाण्यातील विविध घटकामुळे बंद पडत आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यावर ड्रीप करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकरी असल्याने पिकाला पाणी देताना विद्युत पंपाच्या पाईपमध्ये काही अडथळा निर्माण झाल्यास अगदी डोक्यापर्यंत पाण्यात व गालात उतरावे लागत आहे.
उजनी काठावरील गावात काही प्रमाणात फिल्टर बसवण्यात आले आहेत. मात्र ते केवळ गावा पुरतेच मर्यादित असल्याने वाड्या वस्त्यांवरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या काही गावात फिल्टर बसवण्यात आले आहेत.
नागरिकांचे आयुर्मान घटत चालले
शिवाय शेतकऱ्यांनी शेताला पाणी देताना पायात गुडघ्यापर्यंत बूट वापरावे. त्यामुळे काहीसा यावर पायबंद करता येईल. उजनीच्या दूषित पाण्याचा परिणाम माणसांबरोबर पशु, पक्षी, शेतजमीनीवरही झाला आहे. त्यामुळे उजनी काठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित अन्न व दूषित पाणी याच्या सेवनामुळे या भागातील नागरिकांचे सरासरी अनुमान घटत चालले आहे. याकडे शासनाने गांभीयाने लक्ष देण्याची गरज आहे.
उजनीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे.त्यामुळे दररोज पोटदुखी, मुतखडा व त्वचेचे विकार असलेले नवीन आठ ते दहा रुग्ण पाहावयास मिळत आहेत. या दूषित पाण्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्वचेला खाज सुटणे, डाग पडणे, सतत पोटदुखी, पोटात इन्फेक्शन होणे, महिलांचे मासिक पाळीचे चक्र बिघडणे यासारखेच आजार होत आहेत. त्यासाठी नागरिकांनी उजनीचे पाणी न पिणे हाच योग्य उपाय आहे.
-डॉ. शीतलकुमार शहा, डॉक्टर.
उजनीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. जनावरे यांच्यासह शेतातील उत्पादकता देखील या दूषित पाण्यामुळे कमी झाली आहे. उजनीच्या पाण्याला उग्र वास येत आहे. त्याच बरोबर रसायनामुळे विविध रंगाचे पाणी पाहावयास मिळत आहे. पिण्यासाठी उजनीचे पाणी अगदी फिल्टर बसून देखील उपयोगीचे ठरत नाही कारण पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाल्याने ते फिल्टर ला देखील शुद्ध करणे अवघड होत आहे.
-भालचंद्र बांडे, माजी सरपंच, पळसदेव.