Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 107 व्या भागात देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी आज झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मुंबईवरील हल्ल्यात प्राण गमावलेल्या शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 26 नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही, या दिवशी देशावर सर्वात भयंकर हल्ला झाला होता, असे म्हणत त्यांनी वीरपुत्रांना श्राद्धांजली वाहिली.
पंतप्रधान मोदींना आजच्या सुरुवातीलाच शहिद जवानांना श्रद्धांजली वाहताना, “26 नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी देशात सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबईसह संपूर्ण देश हादरवून सोडला होता. पण त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता पूर्ण धैर्याने दहशतवादाचा पाडाव केला, ही भारताची ताकद आहे. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांना आज देश आठवत आहे.” असे म्हटले आहे.
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशात खादी उत्पादनांची विक्री 30 हजार कोटींपेक्षा कमी होती, ती आता 1.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत देशात दिवाळी, भाऊबीज आणि छठ या सणांवर 4 लाख कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाला आहे. आणि या काळात भारतातील उत्पादने खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. आता तर घरातील मुलेही दुकानात काही खरेदी करताना त्यावर मेड इन इंडिया लिहिलेले आहे की नाही हे तपासू लागले आहेत. इतकेच नाही तर आता लोक ऑनलाईन वस्तू खरेदी करताना मूळ देश तपासण्यास विसरणार नाहीत.”
‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, “26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारताचं संविधान स्वीकारलं होतं. मी सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. विकसित भारताचा संकल्प आपण सर्व मिळून नक्कीच पूर्ण करू.”असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.