मंचर (प्रतिनिधी) – लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाले. या कार्यकाळात मंचरची बाजारपेठ फुलली. रस्ते गजबजले; पण परिणामस्वरूप सुरक्षित समजल्या गेलेल्या मंचर शहरात आठ दिवसांत 5 करोनाबाधित आढळल्याने मंचरकरांची चिंता वाढली आहे.
मंचर शहरात लॉकडाऊन काळात जवळपास तीन महिने एकही करोना रुग्ण नव्हता. ग्रामस्थ जागरुकपणे, संयमाने, कदाचित भीतीमुळे घरात राहिले. लॉकडाऊन शिथिल झाल्याने रुग्णांची संख्या वाढली, असे सरपंच दत्ता गांजाळे यांनी सांगितले आहे. कदाचित 85 टक्के लोकांना करोना होत नाही किंवा आपोआप बरे होतात हा अतिविश्वास याला कारण असावा. तो खरा असेलही; पण आपण घरातल्या वयस्कर, मधुमेही, उच्च रक्तदाब, हृदयरोग इतर आजार असलेल्या 15 टक्के व्यक्तींना सांभाळणे गरजेचे आहे. मंचर शहराची लोकसंख्या 50 ते 60 हजार गृहीत धरली तरी 7 ते 8 हजार नागरिक धोकादायक गटात येतात. तालुक्यात एकावेळी जास्तीत जास्त 100 ते 150 रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. याहून एकावेळी जास्त रुग्ण झाले तर त्यांना उपचार करण्यासाठी फारशी सोय नाही. मंचर शहरातील दुकाने रविवार (दि. 12) पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.
प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असले तरी सवांना त्यांच्या मनासारख्या सुविधा देणे केवळ अशक्य आहे. उपजीविकेसाठी, कर्तव्यासाठी जरुर बाहेर पडा. मात्र विनाकारण फिरून बाधित झालात तर तुमच्यामुळे कुटुंबाचे कसे होईल, याचा आधी विचार करा. करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सहकार्य करा.
– जालिंदर पठारे, गटविकास अधिकारी