कोलकाता – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा एकतर्फी विजय झाल्यानंतर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आता कॉंग्रेस पक्षाबाबतचा सूर बदलला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपण स्वबळावरच लढणार असल्याचे त्या म्हणत होत्या. बंगालमध्ये कोणाशीही आघाडी केली जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र आता जेथे कॉंग्रेस पक्षाची स्थिती चांगली असेल तेथे त्या पक्षाला पाठिंबा दिला जाईल असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
कर्नाटकातील विजयानंतर कॉंग्रेस पक्ष ऍक्शन मोडमध्ये आला आहे. देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावण्याची तयारी कॉंग्रेसने सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ममता यांच्या या विधानाला महत्व आले आहे. ममता म्हणाल्या की कॉंग्रेस जेथे बळकट असेल तेथे त्यांना पाठिंबा दिला जाईल. मात्र त्यांनीही इतर पक्षांची स्थिती समजून घेणे गरजेचे आहे. आम्ही पाठिंबा द्यायचा आणि त्यांनी आमच्याच विरोधात लढायचे असे होऊ शकत नाही. त्यांनाही काहीतरी त्याग करावा लागेल.
दरम्यान, एका माध्यमाच्या पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत ममता यांनी भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्याची योजनाच मांडली. ज्या राज्यात जो प्रादेशिक पक्ष भक्कम असेल त्या राज्यात भाजपशी त्या पक्षानेच लढत दिली पाहिजे. दिल्लीत आम आदमी पक्ष, बिहारमध्ये नितीश कुमार यांचा पक्ष आणि अन्य राज्यांतही तेथील प्रबळ पक्षाने भाजपशी लढले पाहिजे आणि इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.
याचाच अर्थ ममतांना कोणत्याही एका पक्षाचा राजकीय दबदबा नको आहे असा काढला जातो आहे. भाजप विरोधातील विरोधकांच्या आघाडीत आतापर्यंत कॉंग्रेस पक्ष नेतृत्व करत होता. त्याऐवजी सगळ्या विरोधकांना समान संधी असली पाहिजे आणि ती राज्यांमधील स्थितीच्या अनुशंगाने निर्धारित झाली पाहिजे असे ममता बॅनर्जी यांनी सूचित केले आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ममता बॅनर्जी कॉंग्रेसला महत्वच देत नव्हत्या. कॉंग्रेस भाजपला पराभूत करू शकत नाही अशी थेट भूमिकाही त्यांनी मांडली होती. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यात ज्याप्रकारे आरोप प्रत्यारोप झाले त्यावरून हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची सूतराम शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले होते. तथापी, आता कर्नाटकातील निकालानंतर चित्र बदलू लागल्याचे दिसते आहे.