कोलकता – विरोधी पक्षांची देशव्यापी आघाडी असणाऱ्या इंडियाची बैठक ६ डिसेंबरला दिल्लीत होणार आहे. त्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत.
नुकतेच विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्या निवडणुकांत भाजपची सरशी झाली. संबंधित निकालांवरून इंडियामधील मित्रपक्षांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले. भाजपच्या यशापेक्षा ते कॉंग्रेसचे अपयश आहे. कॉंग्रेसने इतर पक्षांशी हातमिळवणी करायला हवी होती, असा सूर त्यांनी आळवला. त्यामुळे कॉंग्रेसच्या पीछेहाटीनंतर इंडियामध्ये धुसफूस सुरू झाल्याचे चित्र समोर आले. तसे असले तरी निकालांनी दिलेल्या इशाऱ्याने सावध झालेल्या इंडियाने पुढील बैठक बोलावली आहे. पण, त्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती स्वत: ममतांनी सोमवारी दिली.
मला बैठकीच्या तारखेची माहिती नव्हती. ती आधी मिळाली असती; तर मी उत्तर बंगालचा दौरा निश्चित केला नसता. आता पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी इंडियाच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, असे त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि जवळ येऊन ठेपलेली लोकसभा निवडणूक आदींचा विचार करता इंडियाच्या बैठकीविषयीचे कुतूहल वाढले आहे. अशात ममतांची बैठकीला संभाव्य दांडी ही बाबही चर्चेचा विषय ठरणार आहे.