कोलकता –बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकत्यात भेट घेतली. त्या भेटीनंतर ममतांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. खोटे बोलून, प्रसारमाध्यमांचा पाठिंबा घेऊन भाजप मोठा हिरो बनला. त्या पक्षाला झिरो बनवण्याची माझी इच्छा आहे, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
पुढील लोकसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकीत भाजपपुढे आव्हान उभे करण्यासाठी एकत्र येण्याच्या हालचाली विरोधी गोटात सुरू झाल्या आहेत. विरोधकांना एकत्र करण्यात नितीश आणि तेजस्वी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातून त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
त्यांनी ममतांची घेतलेली भेट विरोधक एकजुटीच्या प्रयत्नांना वेग देणारी ठरण्याची चिन्हे आहेत. त्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ममता यांनी विरोधक ऐक्यासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी पुढील रणनीती ठरवण्यासाठी बिहारमध्ये सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावण्याचा प्रस्ताव नितीश यांच्यापुढे मांडला. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी एकत्रितपणे सज्ज होण्यास त्यांच्यात सहमती असल्याचे स्पष्ट झाले.
कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका नितीश यांनी घेतली आहे. मात्र, ममतांनी याआधी भाजप आणि कॉंग्रेसपासून समान अंतर ठेवण्याचे जाहीर केले होते.
त्यामुळे पत्रकारांनी त्यांना कॉंग्रेसविषयीचा प्रश्न विचारला. त्यावर ऐक्याच्या प्रयत्नांत सर्व विरोधी पक्ष सहभागी असल्याचे उत्तर ममतांनी दिले. कुठलाच पक्ष किंवा कुठल्याच नेत्यासमवेत कार्य करण्यास माझा विरोध नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यातून ममतांचा कॉंग्रेस विरोध मावळत चालल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.