मोहित देवधर
खंडाळा – वाई- खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघामध्ये 2009 पासुन सलग तीन वेळा हॅट्रीक साधत आमदार मकरंद पाटील यांनी एकतर्फी वर्चस्व राखले आहे. आ. मकरंद पाटील यांनी आमदारकीसोबतच कारखाना, स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक असे अनेक गड जिंकत मतदारसंघात वेगळाच दबदबा निर्माण केला आहे. राज्यात सत्ता असो वा नसो मकरंद आबांचे कोणतेही काम सत्तेवाचून अडलेले नाही.
माजी आमदार मदन भोसले यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवून 2009 मध्ये मकरंद आबा विजयी झाले होते. त्या विजयानंतर आ. मकरंद पाटील यांनी निर्माण केलेल वर्चस्व अजूनपर्यंत कोणी भेदू शकले नाही. देशात 2014 मध्ये मोदी लाट आली होती. मात्र, तेव्हाही आमदार मकरंद पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून पुन्हा एकदा निवडून आले व मदन भोसले यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली. 2019 मध्येही विजयाची पुनरावृत्ती करत आबांनी आमदारकीची हॅट्रीक साधली. एकंदरीत सलग 3 टर्म मतदारसंघात मकरंद पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवल्याने मकरंद आबांचे चक्रव्यूह येत्या 2024 ला भेदणे खूप अवघड आहे. हा चक्रव्युह कोण भेदू शकेल का, याबाबत लोकांमध्ये चर्चा आहे. आ. मकरंद पाटील यांच्या विरोधात प्रमुख संभाव्य उमेदवारांमध्ये माजी आ. मदन भोसले व शिवसेनेच जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांची नावे चर्चेत आहेत.
आ. मकरंद पाटील यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी माजी आ. मदन भोसले आहेत. भोसले माजी आमदार तसेच किसन वीर साखर कारखान्याचेही सर्वेसर्वा होते. 2019 ला भाजप प्रवेशामुळे मदन भोसले यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, 2019 लाही जनतेची साथ आबांनाच मिळाली. त्यात आता भुईंज व खंडाळा येथील किसन वीर साखर कारखानाही हातातून गेल्याने मदन भोसले यांची ताकद कमजोर झाल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनीही संघटनात्मक मोर्चेबांधणी जोरदार सुरु केली असून शिवसेना पक्षवाढीसाठी त्यांनी अनेक मातब्बरांचा पक्षप्रवेश करून वेगळे वातावरण निर्माण केले आहे.
विधानसभेला ही जागा शिवसेनेला मिळाली तर विद्यमान आमदारांना कडवी टक्कर मिळेल, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. आमदारकीची स्वप्न पाहणारे इतर बरेच स्वयंघोषित भावी आमदार आहेत. मात्र, विद्यमान आमदारांच्या विरोधात वरील दोनच पर्याय शिवसेना- भाजपकडे असल्याचे चित्र दिसत आहे. तीन तालुक्यांचा मोठा मतदारसंघ तरीही गावोगावी संपर्क, सलग तीन टर्म यामुळे मकरंद आबांची ताकद मोठी आहे. त्या तुलनेत त्यांच्याशी टक्कर देण्यासाठी कोणीही मैदानात आले तरी सोपे तर नाहीच. पण मोठा संघर्ष करावा लागूनही कसलीच खात्री सध्या तरी सांगता येत नाही.