आपल्या शेतातील कामे आटपून इतरांच्या शेतात रोजंदारीवर काही कामे घ्यावी यावर आई आणि तिच्या काही मैत्रिणींच्या गप्पा सुरू होत्या. अनेक महिला एकाच जागी भेटल्या म्हणून आईसह सर्वजनींना मी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता.
आता हा काय नवीन दिवस काढला तुम्ही लोकांनी असं म्हणत त्यांनी मला याविषयी अधिक बोलायला भाग पाडलं, खरंच महिलासाठी असा काही दिवस असतो हे त्यातील कुणालाच माहीत नव्हतं. या एका प्रसंगाने अनेक प्रश्न माझ्यासमोर उभे राहिले होते. विसाव्या शतकात महिलांनी स्वतः च्या हक्कासाठी जो लढा दिला होता त्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो.
वर्षानुवर्षे आपण महिला सक्षमीकरणासारख्या मुद्यांना गोंजारत आलोय, प्रत्येक क्षेत्रात त्यांचे प्रमाण वाढले पाहिजे म्हणून वेगवेगळ्या परिषदा घेत आलो पण याचे परिणाम कितपत झाले याची शहानिशा आपण कधीच केली नाही, ग्रामीण स्त्री आपल्या डोळ्यासमोर कधिच आली नाही. त्यातील एक- दोघींच्या प्रश्नांनी तर मला खडबडून जागे केलं. काय असतो हा महिला दिन? त्याचा आम्हाला काही फायदा आहे का?आमच्या आयुष्यात काही बदल होणार आहे का?अशा प्रश्नांनी मला भांबावून सोडलं होतं. त्यांच्या या प्रश्नांनी मला निरुत्तर केले होते.
रात्रंदिवस नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून स्वतः च्या शेतात राबायचं, घरदार, लेकरं-बाळं सारं सांभाळून इतरांच्या शेतात रोजंदारीवर कामाला जायचं,रात्री दमून भागून आलं की दोन घास खायचे आणि झोपायचं असं सगळं आयुष्य एकाच रहाटगाडग्यात सुरू आहे, बदल म्हणावा तसा काहीच नाही, तो महिला दिवस आमच्या आयुष्यात काही वेगळा बदल घडवणार असेल तरच तो आमच्या कामाचा. म्हणून त्या थांबल्या. मी मनोमन विचार केला की,त्यांच्या या बोलण्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही.
एका बाजूला परिषदा,व्याख्याने, कविसंमेलने, कर्तृत्ववान महिलांचे सत्कार अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाने जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा होत होता आणि दुसऱ्या बाजूला महिलासाठी असाही दिवस असतो याची पुसटशीही कल्पना नव्हती, एकाच देशात किती हा विरोधाभास.
इतर महिलांप्रमाणे त्यांच्याही आयुष्यात बदल घडवता येईल, त्यांनाही हा दिवस कसा साजरा करता येईल याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे.
-विष्णू नाझरकर,
कॉलेज रिपोर्टर,
राज्यशास्त्र विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ