वंदना बर्वे
स्वबळाची भाषा, तिसऱ्या आघाडीची गरज, असे मुद्दे राजकीय पटावर चर्चिले जात असताना पुढील राजकीय वाटचाल नक्की कोणते वळण घेते हे पाहणे रंजक ठरेल.
महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कॉंग्रेस आणि राकॉं मिळून लढत असताना ही स्थिती आहे. अशात, स्वबळावर लढला तर कितव्या क्रमांकावर पोहोचेल? याची कल्पना करा! याशिवाय, महाराष्ट्र कॉंग्रेसची सर्वात मोठी समस्या म्हणजे बुडाला लागलेली तिजोरी. तिजोरी खरडून रिकामी झाली आहे. खिशात दमडी नसताना स्वबळावर निवडणूक लढायला पैसे कुठून आणणार?
आगामी सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्याची कॉंग्रेसची तयारी असेल तर मग राज्यसभेची निवडणूकसुद्धा स्वतंत्र लढावी लागेल. शिवसेना आणि राकॉंसुद्धा आपला उमेदवार उभा करणार. मग कॉंग्रेसच्या हाती काय लागणार? या प्रश्नाचे उत्तर नाना पटोलेंना विचारण्यात आले असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे अकाली निधन झाल्यामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यवर्ती पातळीवर भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोर्चेबांधणी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि याच भागात त्यांनी मंगळवारी अनेक पक्षांच्या नेत्यांची आणि नामांकित व्यक्तींची बैठकदेखील आयोजित केली. प्रत्यक्षात पवार आपला सामर्थ्य खेळ दाखवत आहेत. खासदार आणि आमदारांची संख्या लक्षात घेतली तर राष्ट्रवादी विरोधी पक्षांच्या तुलनेत मागे आहे. तरीसुद्धा, पवार यांच्यासारखी दूरदृष्टी आणि अनुभव असलेला दुसरा नेता नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अशी पदं त्यांनी भूषविली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेला पवार यांच्याव्यतिरिक्त दुसरा नेता नाही. कदाचित म्हणूनच ते सक्रिय झाले आहेत. सध्या विरोधकांच्या एकतेची धुरा शरद पवारांच्या भोवती फिरत आहे.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या घटक पक्षांची एकही बैठक एवढ्यात झालेली नाही. किंबहुना, संपुआची शेवटची बैठक कधी झाली होती? याचे उत्तर शोधण्यासाठी भूतकाळाची पाने चाळावी लागतील. यामुळे संपुआच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे आजच्या परिस्थितीत कॉंग्रेसला विरोधी पक्षाची कमान मिळण्याची शक्यताही फार कमी दिसून येत आहे.
शरद पवार एक नेता म्हणून ते नेहमीच मदतीला धावून आले आहेत. विरोधी-शासित राज्यांचे मुख्यमंत्री राजकीय अडचणीत असतात किंवा त्यांचा केंद्राशी संघर्ष झाला आहे, तेव्हा शरद पवार त्या मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. एकतर पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची आघाडी स्थापन करावी किंवा त्यांना यूपीएचे संयोजक करावे, असा प्रचारही शिवसेनेने केला आहे. पण कॉंग्रेस हे मान्य करत नाही.
मागील काही दिवसांपासून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे शरद पवार यांची सारखी भेट घेत आहेत. खरं म्हणजे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी किशोर यांना देशातील तमाम विरोधी पक्षांची मोट बांधण्याची जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी ते पार पाडत आहेच. शिवाय, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची शक्तिशाली आघाडी तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तगडं आव्हान देण्याची तयारी करण्याचे कार्य करीत आहेत. ते सर्व विरोधी पक्षांना पवारांच्या नेतृत्वात काम करण्यास राजी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
देशातील राजकीय परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांना भेटण्याची प्रक्रिया पवार ज्या पद्धतीने वाढवत आहेत, ते कॉंग्रेससाठी देखील एक इशारा आहे. कारण जर पवारांच्या नेतृत्वात विरोधी पक्ष एकत्र झाला तर देशातील सर्वात जुना पक्ष काठावर फेकला जाईल. गेल्या दीड आठवड्यात प्रशांत किशोर शरद पवार यांना तीनदा भेटले आहेत. या बैठकींचे मोठे परिणाम आगामी काळात दिसून येतील आणि लवकरच पवार निवास विरोधी पक्षाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनण्याच्या मार्गावर दिसेल.
कलम 370 हटवल्यापासून काश्मीरची परिस्थिती फारशी बदलली नाही; परंतु याच आठवड्यात 24 जून रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर राजकीयदृष्ट्या बाजूला पडलेल्या राजकीय पक्षांमध्ये मात्र पुन्हा नवा उत्साह संचारला असल्याचे काश्मीरविषयी अभ्यास करणाऱ्यांचं मत आहे.
जम्मू-काश्मीरच्या नेत्यांबरोबरची बैठक म्हणजे मोदींचा यू टर्न असं म्हटलं जात असलं, तरी प्रत्यक्षात यात तथ्य नाही, असं तज्ज्ञांचे मत आहे. या बैठकीच्या माध्यमातून मोदींनी काश्मीरच्या स्वायत्ततेची मागणी करणाऱ्यांना काहीही ठोस आश्वासन दिलं नाही, पण पाकिस्तानकडून होणारे मुत्सद्दी हल्ले आणि मुस्लीमविरोधी असल्याचा त्यांच्यावर होणारा आरोप, या दोन्हींपासून त्यांनी स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे.