हेमंत महाजन
सलग दोन-तीन दिवसांपासून ड्रोन हल्ले होत आहेत. देशात अशाप्रकारे पहिलांदाच ड्रोनद्वारे हल्ला होत आहे. तपासाची सूत्रे एनआयकडे देण्यात आली आहेत.
जम्मू एअरफोर्स स्टेशनच्या टेक्निकल एरियाजवळ स्फोट झाला. स्फोटके ड्रोनमधून खाली टाकण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेते म्हणजे “गुपकार’शी चर्चा केली. मात्र, 72 तासांच्या आत जम्मू-काश्मिरात हिंसाचार व दहशतवादी हल्ले सुरू झाले आहेत. काश्मीर व भारत कायम अशांत राहावा आणि काश्मीर जगाच्या अजेंड्यावरून कधीही अदृश्य होऊ नये, यासाठी असे हल्ले होत राहणारच.
जम्मू विमानतळ भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेपासून केवळ 14 किलोमीटर अंतरावर आहे. माल वाहतुकीसाठी वापरले जाणारे बहुतांश हेलिकॉप्टर आणि अनेक मोहिमा या बेसवरून राबवल्या जातात. जम्मू एअरफोर्स स्टेशन ही हेलिकॉप्टर्स ठेवण्याची सर्वात महत्त्वाची जागा आहे. चेतक आणि एमआय-17 हेलिकॉप्टरही येथे असतात. याठिकाणी सर्व सुटे भाग, एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर, सर्व हार्डवेअर ठेवले जाते. जम्मू एअरफोर्स स्टेशन या परिसरात सैन्याला मदत पोहोचवण्याचं प्रमुख माध्यम आहे.
पाकिस्तानची गुप्तहेर संस्था “आयएसआय’ने ड्रोनच्या मदतीने “एके-47′ रायफल, स्फोटके, अंमलीपदार्थ आणि बनावट नोटा भारतामध्ये पाठवले आहे. ड्रोनपासून रक्षण करणे हे तितकेसे सोपे नाही, हे समजले पाहिजे. ड्रोन्स कमी उंचीवरून उडतात. ते कोणत्याही दिशेने येऊ शकतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एअर डिफेन्स सिस्टिम लावणे सोपे नाही.
ड्रोन्स म्हणजे नक्की काय?
ड्रोन्स अनमॅन्ड एरियल व्हेइकल्स (मानवरहित) म्हणजे एक छोटे विमान जे रिमोटच्या मदतीने उडवता येते. ड्रोनची रेंज त्याच्या आकारावर, त्यातील तंत्रज्ञानावर अवलंबून असते. ड्रोन्सचे चालक जमिनीवरून नियंत्रण करून ड्रोन्स उडवितात. नियंत्रण जमिनीवरून होत असल्यामुळे उडण्याचे क्षेत्र मर्यादित असते. ड्रोन पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने संगणकीय आज्ञावली व उपग्रहीय संदेश वापरून एका ठरावीक पूर्वनियोजित मार्गावरून उडविता येऊ शकते. त्यामुळे याचा उपयोग शस्त्रे घेऊन जाण्याकरता (जसा “आयएसआय’ने केला) किंवा क्षेपणास्त्र फायर करण्याकरता (जसा अमेरिका अफगाणिस्तान/पाकिस्तानमध्ये करते) केला जातो. स्वस्त असल्यामुळे व चीनकडून मिळत असल्यामुळे ती दहशतवाद्यांनी वापरली.
आपल्याकडील निरीक्षण रडार ही महत्त्वाच्या ठिकाणी लावलेली असतात. संपूर्ण साडेचार हजार किमी पाकिस्तानी सीमेवरती किंवा 7 हजार 600 किलोमीटर या समुद्री सीमेवर अशा प्रकारचे लक्ष ठेवणारी सिस्टिम आपल्याकडे नाही. कारण, ही सिस्टिम अतिशय महागडी असते.
ड्रोनचे तंत्रज्ञान आणि त्यांची निर्मितीही सोपी आहे. जर ड्रोनच्या मदतीने सीमावर्ती भागात शस्त्र किंवा स्फोटक पदार्थ किंवा अंमलीपदार्थ पाठवली जात असतील, तर आपले रक्षण कसे करायचे? आपली रडार सातत्याने सुरू ठेवणे खर्चिक असते. म्हणजे काही ड्रोन्स सीमेवरून घुसल्याने आपण हजारो कोटी रुपये खर्च करून रडार कव्हरेज देण्याचा विचार करणे अव्यवहार्य आहे. म्हणून कमी किमतीने आपले रक्षण कसे करता येईल, यावर अधिक लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
आपल्या देशामध्ये अनेक मोठी शहरे आहेत. त्यात विविध महत्त्वाच्या संस्था म्हणजे तेल कारखाने, न्युक्लिअर रिऍक्टर वगैरे आहेत. या सर्वांचे ड्रोनपासून रक्षण करणे महागडे ठरते. आपण एस-400 नावाची अत्याधुनिक हवाई संरक्षण व्यवस्था रशियाकडून विकत घेत आहोत. परंतु, ती केवळ एखाद्या शहराचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहे. ती देशाच्या सर्व जमिनी सीमा किंवा सागरी सीमा यांचे रक्षण कधीही करू शकत नाही. महागडी विमाने, प्रचंड महागड्या एअर क्राफ्ट कॅरिअर्स किंवा मोठी जहाजे यांचे ड्रोनपासून रक्षण करणे सोपे नाही.
ड्रोन्सवर स्फोटके घालून त्यांचा इम्प्रोव्हाइज एक्स्प्लोजिव्ह डिव्हाइस म्हणजे उडती आयईडी म्हणूनसुद्धा वापर केला जाऊ शकतो. आयईडीज इराक आणि अफगाणिस्तानात हवेतून अमेरिकन सैन्याविरुद्ध थोड्या प्रमाणात वापरल्या गेल्या आहेत. आपल्या लांबलचक समुद्रकिनाऱ्यावर कुठलीही संरक्षण व्यवस्था उपलब्ध नाही.
स्मॉल आर्म्स, लाइट मशीनगन यांचा वापर करून संशयास्पद ड्रोनना लगाम घालण्यासाठी स्काय फेन्स, ड्रोन गन, ड्रोन कॅचर, स्कायवॉल 100 यांसारखे तंत्रज्ञान जगात आहे. कुठलाही पर्यायच काही महत्त्वाच्या ठिकाणीच वापरला जाऊ शकतो. कारण ही सगळी महागडी शस्त्रे आहेत. भारतालाच काय पण इतर विकसित देशांनासुद्धा परवडण्यासारखी नाही.
भारतीय पायदळाच्या बटालियन लढाईमध्ये शत्रूंच्या विमानाविरोधात त्यांच्याजवळ असलेली स्मॉल आर्म्स, लाइट मशीनगन यांचा वापर करून हवाई सीमेचे रक्षण करतात. अशाच प्रकारची संकल्पना सीमा संरक्षणासाठी आपल्याला वापरावी लागेल. सीमेवरती असलेल्या सीमा सुरक्षा दल, नौदल, तटरक्षक दल आणि शहरात पोलीस किंवा सैन्याने अशा प्रकारची वाहने हवेतून येताना दिसली, तर त्यांच्यावर फायर करून त्यांना तिथेच पाडण्याची योजना राबवू शकतील.
येत्या काळात ड्रोनच्या विरुद्ध रक्षण करण्यासाठी कमी किमतीची एअर डिफेन्स सिस्टिम तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यासाठी लक्ष केंद्रित केले पाहिजे. तोपर्यंत आपल्याकडे असलेली संरक्षण व्यवस्थाच वापरावी लागेल.
याशिवाय आपल्याला पाकिस्तानला इशारा द्यावा लागेल की, अशा प्रकारचे ड्रोन भारतात पाठवण्याचा प्रकार केला तर आम्हीही ड्रोन पाठवून तुमचे नुकसान करू शकतो. स्वसंरक्षण करणे अत्यंत खर्चिक आहे. त्यापेक्षा अशा कडू औषधाची चव पाकिस्तानला देऊन स्वसंरक्षण करण्यास भाग पाडले पाहिजे. याशिवाय आपल्या देशात तयार होणारे ड्रोन्स आणि त्यांचे महत्त्वाच्या आस्थापनांजवळ उड्डाण करणे यावरही नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
कमी खर्चात दहशतवादी हल्ले भारतावर करून पाकिस्तान आपल्या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न करत आहेत. म्हणून ड्रोनविरुद्धची लढाई आता आपल्याला पाकिस्तानच्या आत न्यावी लागेल. आक्रमक कारवाया, कमी खर्चिक उपाययोजना यासोबतच अतिशय कल्पकतेने ड्रोन दहशतवादाविरोधात भारताला वापरावे लागेल. ड्रोन हल्ला हाही पाकिस्तान सरकारने पुरस्कृत केलेला दहशतवादी हल्ला आहे, बघू या भारतीय हवाई दल कठोर प्रत्युत्तर केव्हा देणार?