Loksabha Election : पुढील दोन महिन्यांतच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. यावेळी भाजपकडून देशात 400 पारचा नारा दिला आहे. त्याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही भाजपकडून जय्यत तयारी केली जात आहे. राज्यात महायुतीकडून एकत्रित पणे निवडणूक लढवली जाणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 32 जागांवर भाजप, 12 जागांवर शिवसेना (शिंदे गट) तर 4 जागा अजित पवार गटासाठी देण्याचा निर्णय झाल्या असल्याची माहिती आहे. मात्र या जागावाटपावरून महायुतीत आता फटाके फुटायला सुरुवात झालीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी जागावाटपावरून एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. भाजपकडून शिवसेनेसाठी ठेवलेल्या 12 जागांचा प्रस्ताव त्यांनी धूडकावून लावला आहे. तसेच आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कीर्तिकर म्हणाले, महायुतीमधील लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कुठून आला मला माहिती नाही. आमच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. आम्हाला 12 जागांचा फॉर्म्युला मान्य नाही. 2019 मध्ये आम्ही 22 जागा लढलो. त्यात 4 ठिकाणी आमचा पराभव झाला. मग आम्ही 12 जागा कशा घेणार? असा सवाल यावेळी कीर्तिकर यांनी उपस्थित केला. भाजप व शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या कोट्यातील जागा देण्याची चर्चा सुरू आहे. पण आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही. आम्ही अधिकाधिक जागा लढवण्यावर ठाम आहोत, असेही गजानन कीर्तिकर यांनी सांगितले.
राज्यात महायुतीसाठी भाजप 32, शिवसेना 12, राष्ट्रवादी 4 या प्रमाणातील फाॅर्म्युल्यावरून आता शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे जागावाटपाच्या मुद्यावरून महायुतीत बेबनाव होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विद्यमान खासदार यांच्यासोबतच इतर बड्या नेत्यांसाठी उमेदवारी हवी आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे वाटाघाटी करताना मोठा दबाव आहे. महायुतीत जागावाटप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. जागावाटपावर हे नेतेमंडळी कसा मार्ग काढणार हे पाहणे महत्वाचे आहे.