मुंबई – राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये 40 टक्के खाटा भरल्याशिवाय आणि वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी प्रतिदिवस 800 मेट्रिक टन पेक्षा जास्त होत नाही तोपर्यंत लॉकडाऊनचा विचार केला जाणार नाही. मात्र या संकटाच्या काळात कठोर निर्बंध लावले जातील, सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी सांगितले.
55 वर्षांवरील पोलीस अधिकाऱ्यांना ड्युटीवर जाण्याची गरज नाही –
कोरोनाबाबत मुख्य सचिवांकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातात आणि व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी आपण त्यांचे पालन केले पाहिजे. तसेच 55 वर्षांवरील पोलीस अधिकाऱ्यांना ड्युटीवर जाण्याची गरज नसून ते त्यांच्या घरून काम करू शकतात, असे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कोरोनाचा अनियंत्रित वेग –
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत करोना संसर्गाचे 26 हजार 538 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 5331 बाधित रुग्ण बरेही झाले आहेत. त्याचवेळी आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर गेल्या 24 तासांत एकट्या मुंबईत कोरोनाचे 15,166 नवीन रुग्ण आढळले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लॉकडाऊन लागू करण्यास दिला नकार –
बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सध्याच्या कोरोना संकटाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी लॉकडाऊन लागू करण्यास नकार दिला आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुंबईतील वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.