पणजी – गोव्यात कॉंग्रेसला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक राजकीय हादरा बसला. कॉंग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या राखी प्रभुदेसाई-नाईक यांनी पक्षातून बाहेर पडत तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
नाईक यांची कॉंग्रेसमधील कारकीर्द अत्यल्प काळचीच ठरली. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी त्या शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्या. मात्र, प्रदेश नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त करत त्यांनी कॉंग्रेसलाही रामराम ठोकला. कॉंग्रेसचे प्रदेश नेतृत्व दिशाहीन बनले आहे. गोव्यातील सत्ताधारी भाजपला केवळ तृणमूलच राजकीय पर्याय ठरू शकतो, अशी भूमिका नाईक यांनी पक्षबदलानंतर मांडली. मागील काही काळात काही महत्वाच्या नेत्यांनी कॉंग्रेसचा हात सोडून तृणमूलची वाट धरली.
तृणमूल प्रथमच गोव्याच्या निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज झाला आहे. तसे असूनही त्या पक्षातील इनकमिंग वाढली आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषकही चकीत झाले आहेत. गोव्यातील राजकीय घडामोडींवरून कॉंग्रेस आणि तृणमूलमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भाजपशी राष्ट्रीय पातळीवर संघर्ष करण्यासाठी एकवटण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांना हादरा बसू लागल्याचे चित्र आहे.