Maharashtra Budget 2024 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज २ वाजता अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरुवात झाली आहे. कुसुमाग्रज यांची कविता म्हणत त्यांनी या अर्थसंकल्पाला सुरुवात केली. लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने राज्याच्या या अर्थसंकल्पात कोणत्या घटकांना फायदा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नुकतेच अर्थसंकल्पाचे वाचन पूर्ण झाले आहे.
यंदाच्या राज्याच्या या अर्थसंकल्पात राज्यातील पर्यटकांना व भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सेवा पुरवण्यासाठी श्रीनगर आणि श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे.
77 कोटींची तरतूद
श्रीनगर आणि श्रीरामजन्मभूमी आयोध्येत राज्य शासनाने जागा उपलब्ध करून घेतल्या असून यासाठी 77 कोटींची तरतूद प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच कोकण विभागात पर्यटनास चालना देण्यासाठी शिवकालीन 32 गड-किल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन करण्यात येणार आहे. याशिवाय रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराचं आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
राज्यातील गुंतवणूक वाढवण्यावर भर
त्यासोबतच राज्यातील गुंतवणूक वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. ७५००किमी रस्त्याची कामं हाती घेतली जातील. याशिवाय भारतातील पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी भूसंपादन पूर्ण झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. वस्त्रोद्योग धोरणांतर्गत प्रत्येक रेशन कार्डावर साडी वाटपाचं काम हाती घेण्यात आलंय. नवी मुंबईतील विमानतळाचा पहिला टप्पा मार्च २०२५ मध्ये सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.