मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. विकेल ते पिकेल धोरण, कृषी पंप धोरण, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी योजनांची घोषणा अजित पवार यांनी केलीय.
कठीण काळात कृषी क्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला तारलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहोत. शेतकऱ्यांचे व्यवहार अधिकाधिक पारदर्शी व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
जाणून घेऊया यंदाच्या अर्थसंकल्पातील कृषी क्षेत्रासाठीच्या घोषणा –
1) चार वर्षात बाजारसमित्यांसाठी 2 हजार कोटी,
2) कृषी पंप जोडणी धोरण राबवणार, कृषीपंप जोडणीसाठी महावितरणला 1500 कोटी रूपये.
3) विकेल ते पिकेल या धोरणाद्वारे 2100 कोटींची खरेदी.
4) संत्रा उत्पादकांसाठी नाशिक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार, 500 भाजीपाला रोपवाटिका उभारणार.
5) शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार, 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी देणार.
6) शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करून दिले. 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी थेट वर्ग केले.
7) 42 हजार कोटींचे यंदा पीक कर्ज वाटले, 3 लाख रूपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने.
8) राज्यात 278 सिंचन प्रकल्पांची कामं सुरू, 26 सिंचन प्रकल्पात 21,698 कोटी.
9) गोसेखुर्दसाठी 1 हजार कोटी, जलसंपदा विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.
10) बळीराजा जलसिंचन प्रकल्पांतर्गत 91 प्रकल्पांची कामं.