मुंबई – राज्याचा अर्थसंकल्प आज सादर झाला आहे. मात्र हा राज्याचा आहे की काही विशिष्ट भागाचा अर्थसंकल्प होता, हे कळत नाही. संपूर्णपणे निराशा करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे म्हणत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली.
फडणवीस म्हणाले की, ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पाने पूर्ण निराशा केली आहे. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांसाठी काहीही नाही. दोन लाखांच्यावर कर्ज असणाऱ्यांसाठी ओटीएस आणणार होते. त्यासंदर्भात तरतूद करण्यात आली नाही. कर्जमाफी योजनेपासून सुमारे ४५ हजार शेतकरी वंचित आहे. त्यांच्यासाठी काहीही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे ठाकरे सरकारची कर्जमाफी सर्वात फसवी कर्जमाफी असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं.
दरम्यान शेतकऱ्यांना सोयाबीन, कापसावरची बोंडअळी, खोडकिडी आणि धानासाठी काहीही मदत कऱण्यात आलेली नाही. वीज बिलासंदर्भात देखील सरकारने फसवी घोषणा केली. शेतकऱ्यांना आलेल्या वीजबीलाला व्याज लावण्यात आलं आहे. त्यामुळे वीजबिलासंदर्भातील घोषणेचा शेतकऱ्याला काहीही फायदा होणार नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तीन लाखापर्यंत शुन्य टक्के व्याज हे देखील फसवं आहे. राज्यात अल्पभूधारक शेतकरी अधिक असल्यामुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होत नसल्याचं फडणवीसांनी सांगिलते.
अनेक योजना केंद्र सरकारच्या असून त्यासाठी केंद्राकडून निधी मिळत आहे. केंद्राच्या मदतीने अनेक योजना पूर्ण होत असताना राज्य सरकारकडून केंद्र सरकारला नावं ठेवायचं धोरण राबवण्यात येत आहे. आजचं बजेट हे राज्याचं होत की, मुंबई शहराचं होतं, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.