आंबेठाण- करोना या महाभयंकर विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. सगळीकडे संचारबंदी लागू केलेली आहे.
अनेक गावांमध्ये करोनाला रोखण्यासाठी विविध उपायोजना प्रशासन राबवत आहे; परंतु काही महाभाग प्रशासनाच्या आदेशांना पायदळी तुडवून विनाकारण रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी स्वतःचे वाहन घेऊन येत आहेत अशा विकृतीवर पोलिसांनी आता कडक कारवाईला सुरुवात केली आहे.
आतापर्यंत खराब वाडी ग्रामपंचायत परिसर, एचपी चौक महाळुंगे इंगळे, आळंदी फाटा, निघोजे अशा वेगवेगळ्या परिसरामध्ये नाका-बंदी तसेच वाहन चेकिंग करत असताना अनेक इसमांनी काहीएक कारण नसताना विनाकारण रस्त्यावर फिरत असताना मिळून आले आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
महाळुंगे पोलीस चौकीत आतापर्यंत 97 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व गुन्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आले आहेत. तसेच कार्यवाही म्हणून 20 वाहने जप्त केली आहेत.