वाघोली (प्रतिनिधी) : चोखीढाणी रोडलगत वाघोलीतील कामगाराचा दगडाने ठेचून करण्यात आलेल्या खुनाचा लोणीकंद पोलिसांनी ३६ तासात उलगडा केला असून याप्रकरणी खून झालेल्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे. जुन्या भांडणावरून वाद झाल्याने दोघांनी खून केला असल्याचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दत्ता लक्ष्मण बंडगर (वय, ३७) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. खूनप्रकरणी सागर कैलास पवार (वय, २७), बालाजी किसन गारे (वय, २९ दोघेही रा. वाघोली) यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाक्यावरील कामगार दत्ता बंडगर १९ जुलै रोजी सकाळी कामासाठी गेले होते. मात्र रात्री कामावरून परतले नाही.
दरम्यान चोखीढाणी रोडवरील पोदार स्कुलजवळ एका मध्यमवयीन व्यक्तीचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसल्याने प्रसारमाध्यमे व सोशल मिडियाच्या माध्यमातून वर्णनाच्या आधारे ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सदरची व्यक्ती वाघोली येथील कामगार बंडगर असल्याचे समजले. नातेवाईकांनी ओळख पटविल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी तत्काळ मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी सूत्रे हलविली.
पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर बंडगर याचा मॅजेस्टिक बांधकाम साईटवरील लेबर कॅम्पचा मित्र सागर पवार व बालाजी गारे यांना ताब्यात घेतले. तिघेही मजुरीचे मिळेल ते काम करीत होते. खून झाला त्यादिवशी तिघांनी चोखीढाणी रोडजवळ एकत्रित दारू प्राशन केली होती. यावेळी जुन्या भांडणावरुण वाद झाल्याने पवार याने मित्र गारे याच्या मदतीने बंडगर याचा डोक्यात दगड घालून खून केला असल्याची कबुली दिली. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक हणमंत पडळकर, बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, संतोष मारकड, दत्तात्रय काळे, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, सुरज वळेकर यांच्या पथकाने केली आहे.