टाकवे बुद्रुक – आंदर मावळ परिसरातील प्रमुख बाजारपेठ टाकवे आहे. मागील काही वर्षापासून दर सोमवारी याठिकाणी आठवडे बाजार भरतो परंतु बाजारपेठ येणाऱ्या महिलांना तसेच नागरिकांना सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. सध्या मुख्य बाजारपेठ जवळच सुतार विहिरी लगत स्वच्छतागृह 2012 मध्ये, निर्मल भारत अभियान अंतर्गत 2.50 लक्ष खर्च करून उभारण्यात आले होते. सध्या स्थिती स्वच्छतागृहाला टाळे लावलेल्या अवस्थेत आहे. येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिणामी या भागात दुर्गंधी पसरली असून घाणीचे साम्राज्य वाढत आहे. येथील लहान बालकांपासून ते वयोवृद्ध नागरिकांना दुर्गंधी व डासांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतागृहाकडे लक्ष देण्याचे कोणीही मनावर घेत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
दर आठवड्याला सोमवारी भाजीपाला विक्री करण्यासाठी खेड तालुका, मावळ तालुका, मुळशी तालुका येथील अनेक विक्रेते या ठिकाणी येत असतात. यामध्ये भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी प्रामुख्याने महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. आंदर मावळची मुख्य बाजार पेठ असणारे टाकवे बुद्रुक येथे सार्वजनिक स्वच्छतागृहाला टाळे लावल्या असल्यामुळे बंद आहे. भाजीपाला खरेदी विक्री करण्यासाठी येणाऱ्या पुरुष व महिलांची स्वच्छतागृह अभावी तारांबळ होताना दिसून येत आहे. नव्याने शौचालय निर्माण करण्यात यावे, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
ग्रुप ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक भाजीपाला विक्रेत्याकडून आठवड्या बाजाराची पावती घेतली जाते. मात्र त्यांना मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. मग आठवडे बाजाराची कर पावती कशासाठी घेतली जात आहे, असा सवाल स्थानिक नगरिक, व व्यापारी यांनी उपस्थित केला आहे.
शौचालयाच्या जागेबाबत काही अडचण येत असल्याने नवीन शौचालय बांधकामास अडथळा येत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या शौचालयाची दुरुस्ती करण्याचा निर्णय झाला आहे. येत्या पंधरा दिवसांत हे काम सुरू करण्यात येईल.
– सुभाष बांगर,ग्रामविकास अधिकारी
ग्रामपंचायतीवर महिला राज तरीही…
टाकवे ग्रामपंचायतमध्ये एकूण 13 सदस्या पैकी 7 महिला सदस्या असूनही महिला संबंधित सार्वजनिक स्वच्छतागृह, आरोग्य शिबीर, महिला समुपदेशन, महिला सक्षमीकरण या सारख्या समस्या सोडविण्यासाठी महिला सदस्याची दमछाक होताना दिसत आहे. चौदाव्या तसेच पंधराव्या वित्त आयोगात महिलांसाठी विशेष राखीव फंड उपलब्ध असताना निधी खर्चासाठी महिला सदस्या पुढाकार घेताना दिसत नसल्याने गावातील महिला नाराजी व्यक्त करत आहे.
तीन संचालकांच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यानच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीची कधी नव्हे यावेळेस प्रतिष्ठेची निवडणूक झाली. यामध्ये टाकवे परिसरातील तीन संचालक निवडून आले आहेत. सदर शैचालयच्या समस्येचा विषय या संचालकांना देखील अवगत आहे. याठिकाणी येणाऱ्या बाजारपेठ मधील भाजी विक्रेत्यांनच्या समस्या सोडविण्यासाठी हे संचालक काय प्रयत्न करतात, हे आगामी काळात दिसणार आहे.