इंद्रायणीनगर – भोसरीतील बीआरटी बस स्थानकाजवळ असलेल्या मजूर अड्ड्यावर सकाळी कामगारांची मोठी गर्दी असते. तसेच स्थानिक रिक्षाचालक व दुचाकी धारक थेट रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी मार्गावरील वाहतूक संथ झाल्याने वाहतूककोंडी होत आहे. यामुळे रोजच्या या समस्येला आवर घालणार कोण असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.
राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाच्या लगत असलेला बीआरटी व एस. टी. बस थांब्यामुळे येथे चाकण, राजगुरूनगर यांसह नाशिककडे जाणाऱ्या बसेस उभ्या राहतात. या बसेस करिता मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी याकरिता रस्त्याच्या डाव्या बाजूला नियोजन करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या रिक्षाचालकांच्या गोंधळामुळे रिक्षा थेट रस्त्यावर उभ्या करून प्रवासी भरण्यासाठी तासन्तास उभ्या असतात. सकाळी चाकरमान्यांची कामावर जाण्यासाठी असलेली लगबग यामुळे या परिसरात नागरिक व वाहनांची एकच गर्दी होते. रस्त्यावरील वाटसरुंना गर्दीतून वाट काढणे जिकरीचे होत आहे. कित्येकवेळा या ठिकाणी किरकोळ अपघाताच्या घटना रोजच्या झाल्या आहेत. यामुळे या परिसरातील रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करून अशा बेजबादार वाहनधारकांना शिस्त लावण्याची खरी गरज आहे.
सेवा रस्त्यावर वाहनांच्या रांगा
महापालिकेने पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर चांदणी चौक ते कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह चौकापर्यंत नो पार्किंगचे फलक लावले आहेत. तरीदेखील बेशिस्तपणाने या फलकांखाली वाहने लावली जात आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांकडून या रस्त्यावर नो पार्किंगची अंमलबजावणी कधी होईल असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. यापूर्वी आळंदी रस्त्यावर सम विषम पार्किंगचे नियोजन केले होते. मात्र, या नियोजनाचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.
राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील बीआरटी, एसटी बस थांबा तसेच रिक्षा स्टॅंड आदी एकाच ठिकाणी असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. परंतु रिक्षाचालक, चार चाकी, दुचाकी वाहनचालक आपली वाहने रस्त्यातच उभा करत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे भोसरीकर त्रस्त असून ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
– स्थानिक नागरिक.
शॉर्टकटला पोलिसांची मिळतेय मूकसंमती
भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाच्या मुख्य चौकात आळंदीकडून येणाऱ्या दुचाकीसाठी चाकणकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून वळण घेऊन जाण्याचा सुरक्षित मार्ग आहे. मात्र, या मुख्य चौकातील उड्डाणपुलाचे कठडे निघाले असल्याने दुचाकी धारक थेट शॉर्टकटचा अवलंब करून अपघातास निमंत्रण देत आहेत. चौकातील पोलीससुद्धा याकडे दुर्लक्ष करीत वाहनधारकांच्या या शॉर्टकटला मूक संमती देत असल्याचे दिसते. यामुळे चाकण मार्गकडून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.