पुणे – राज्यात यापुढे लॉकडाऊन वाढवला जाणार नाही. ज्या भागात करोनाबाधितांची संख्या वाढेल तेथील निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातील, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सांगितले. त्याचबरोबर पुणे, मुंबईसह राज्यात करोनाबाधित वाढत असलेल्या ठिकाणी जुलै महिन्यांपर्यंत सर्व बाधितांना उपचार देण्याएवढ्या बेडची सुविधा उपलब्ध आहेत, असेही ते म्हणाले.
पुण्यातील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी टोपे येथे आले होते. त्यावेळी त्यांनी बारामती हॉस्टेल येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जुलै महिन्यात आढावा घेऊन पुढील तयारी करण्यात येईल. सध्या, करोनाबाधितामध्ये होणारी वाढ चिंताजनक नाही.
सध्या बाधितांचा मृत्यूदर कमी करण्यावर आम्ही अधिक भर देत आहोत. करोनाची लस येत नाही तोपर्यंत नागरिकांनी “सोशल डिस्टन्सिंग’, “मास्क’ आणि “सॅनिटायजेशन या “एसएमएस’ प्रणालीचा अवलंब करावा. पुणे, सोलापूर यांसारख्या महापालिकांनी एक लाखापेक्षा अधिक चाचण्या करण्याची तयारी करावी, अशा सूचना देण्यात आल्या असून चाचण्यांचे अहवाल 24 तासांच्या आत येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी चाचण्यांच्या नव्या पद्धतीवर भर दिला जाईल. प्रतिबंधित क्षेत्राचा (कन्टेंमेंट झोन) आढावा घेतला.
मुंबई आणि पुण्यात एक लाख संख्येमागे होणाऱ्या चाचण्यांची संख्या देशामध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे “चाचण्या कमी होत आहेत’, या आरोपांमध्ये तथ्य नाही. सरकारने कोणतीही आकडेवारी लपवलेली नाही. विरोधकांनी अशा परिस्थितीत तरी राजकारण करू नये.
– राजेश टोपे, आरोग्य मंत्री