जयपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे अपहरण केले आहे. “एनडीए’मध्ये अन्य कोणत्याही नेत्याला श्वास घेण्यासही जागा ठेवलेली नाही, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. देशात आणीबाणी लादल्याला 45 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमित शहा यांनी कॉंग्रेसवर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते.
कॉंग्रेस कार्यकारिणी आणि कॉंग्रेसमधील लोकशाही मूल्यांवर प्रश्न विचारण्याचा भाजप नेत्यांना काहीही अधिकार नाही. केवळ 3-4 मंत्री सोडले तर मोदींच्या मंत्रिमंडळात अन्य कोण कोण आहे, हे देखील लोकांना माहिती नाही. अमित शहा आणि मोदींनी मिळून संपूर्ण भाजपचे अपहरणच केले आहे. “एनडीए’मधील अन्य कोणत्याही नेत्याला श्वास घेण्यासही जागा ठेवलेली नाही. यांनी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस कार्यकारिणीमधील लोकशाही मूल्यांबद्दल प्रश्न विचारू नयेत, असे गेहलोत म्हणाले.
कॉंग्रेसने आपल्या प्रवक्त्यांना काढून टाकले आहे. कॉंग्रेसमधील अन्य नेत्यांची घुसमट होते आहे, अशी टीका अमित शहा यांनी ट्विटमध्ये केली होती. भाजपने गेल्या सहा वर्षात देशातील लोकशाही, वांशिक आणि सामाजिक बांधणी तोडून टाकली आहे. मोदी-शहा यांच्याशिवाय भाजपमध्ये कोणीच नेता का नाही? सर्व विरोधी पक्षांपैकी मोदी आणि शहांना कॉंग्रेसचीच चिंता आहे, याचे आपल्याला आश्चर्य वाटते आहे, असेही गेहलोत म्हणाले होते.
लोकशाही चिरडून टाकणाऱ्या शक्ती ताकदवान आहेत आणि आणीबाणी पुन्हा लागू केली जाऊ शकेल, असे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी 2015 साली म्हटले होते, याची आठवणही गेहलोत यांनी करून दिली. कॉंग्रेस पक्षानेच देशात लोकशाही उभारली, रुजवली आणि संरक्षण केली आहे. मोदी-शहांच्या राजवटीला आव्हान देण्याची क्षमता केवळ कॉंग्रेसमध्येच आहे, म्हणून या दोघांना कॉंग्रेसचीच चिंता वाटते आहे, असेही ते म्हणाले.