सातारा -जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाटण, महाबळेश्वर, वाई, जावळी आणि सातारा या तालुक्यांमध्ये 41 दरडप्रवण गावे आहेत. या गावांसाठी पाच नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. गरज पडल्यास या गावांमधील सर्व कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येईल. पुढील पाच दिवसांसाठी जिल्ह्यात “ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफचे पथक उद्या, दि. 21 रोजी साताऱ्यात दाखल होणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, ती हाताळण्यासाठी प्रशासनाने केलेल्या तयारी आहे याची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. ते म्हणाले, पाटण तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले, महाबळेश्वर तालुक्यासाठी मनोहर गव्हाड, वाई तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, जावळी तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ आणि सातारा तालुक्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
धोकादायक स्थितीत असलेल्या गावांची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. धोकादायक स्थितीत राहणाऱ्या कुटुंबांची तात्पुरती निवास व्यवस्था करणे, भोजन व शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे, संबंधित गावांमध्ये मुक्काम करून, रात्रगस्त घालणे, या जबाबदाऱ्या नोडल अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आल्या आहेत. पाटण तालुक्यात आंबेघर, मरळी, ढोकावळे, हुंबरळी, मिरगाव, डावरी, चोपडेवाडी, वरंडेवाडी, काहीर, दिक्षी, खुडुपलेवाडी, मेंडोशी, बोरगेवाडी, जितकरवाडी, जोशेवाडी, जायगुडेवाडी, कुसावडे, महाबळेश्वर तालुक्यात एरंडोल, धावली, दुधोशी, भेकवली, वाडी, आचली, कुमठे, घावरी, मालुसरे, दरे, चिखले, चतुरबेट, नावली, शिंदोळा, वाई तालुक्यात कोंडावळे, जोर, जावळी तालुक्यात बोंडारवाडी, भुतेघर, सातारा तालुक्यात सांडवली, केळवली, बोंडारवाडी, भैरवगड, मोरेवाडी ही दरडप्रवण गावे आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण सरासरी 247.9 मिलीमीटर पाऊस झाला असून, पावसाची टक्केवारी 63 आहे. कोयना धरणात 37.56 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
धोम धरणात 35 टक्के, धोम-बलकवडी धरणात 72.22 टक्के, कण्हेर धरणात 28.99 टक्के, उरमोडी धरणात 40.21 टक्के, तारळी धरणात 65.92 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासांत कोयनानगर येथे 253 मिलीमीटर, नवजा येथे 274 मिलीमीटर, महाबळेश्वर येथे 334 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सध्या कोणत्याही धरण्यातून पाण्याचा विसर्ग सुरू नाही. कोयना धरणात 74 हजार 569 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. जिल्ह्यात 172 गावे पूरप्रवण आणि 124 गावे संभाव्य दरडप्रवण आहेत. कराड व पाटण तालुक्यांसाठी एनडीआरएफचे एक पथक तैनात करण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थितीत संपर्कासाठी शासकीय यंत्रणेला 15 सॅटेलाइट फोन देण्यात आले आहेत.एनडीआरएफचे 25 सदस्यांचे पथक शुक्रवारी (दि. 21) साताऱ्यात दाखल होणार आहे.
पावसाळ्यातील धोके ओळखून जिल्ह्यातील धबधब्यांच्या परिसरात पर्यटकांनी जाणे टाळावे. दरडप्रवण क्षेत्रातील गावांसाठी आपत्कालीन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची जबाबदारी संबंधित प्रांताधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यातील 369 कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले असून, महाबळेश्वरमधील 65 कुटुंबांना त्यांच्या नातेवाइकांकडे स्थलांतरीत करण्यात आले आहे. पाटण तालुक्यातील 150, जावळी तालुक्यातील नऊ आणि सातारा तालुक्यातील साठ कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.
पाटण तालुक्यातील कोयनानगर, जिमनवाडी, सावरवाडी, मारवाड, बोरगेवाडी, कळंबे, भाटेवाडी, बाबळवाडी, जावळी तालुक्यातील घोटेघर, रांजणी, धनगर पेठ आणि सातारा तालुक्यातील मोरेवाडी, टोळेवाडी, मांडवे येथे एकूण 47 निवारा शेड आपत्कालीन परिस्थितीसाठी बांधण्यात आली आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाच तालुक्यांमधील सर्व शाळा, महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाने गुरुवारी सुट्टी जाहीर केली होती, तरीदेखील साताऱ्यात एक खाजगी शाळा सुरू ठेवण्यात आल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर, त्या शाळेसंबंधी शिक्षणाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून, संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.