मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले असून ही ठाकरे सरकारला चपराक आहे. यामुळे सरकारने आतातरी मेट्रो कारशेड प्रकल्पाबाबत असलेला अहंकार सोडून आरेमध्ये काम करावे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
मुंबई येथे पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने एमएमआरडीला दिलेली कांजूरमार्गची जागा हा निर्णय चुकीचा आहे. ही जागा पहिल्यापासून वादात होती. जर कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड करायचा असेल तर चार वर्ष आणखी विलंब होणार आहे. तसेच 4 हजार कोटींचा भुर्दंड सुद्धा राज्य सरकारला बसणार आहे. तरी सुद्धा राज्य सरकार हट्ट का करत आहे, हे कळायला मार्ग नाही, असेही ते म्हणाले.
न्यायालयाने दिलेला आदेश ही राज्य सरकारला चपराक आहे. आधीच या आरेतील जागेला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता तरी इगो सोडून आरेमध्येच काम करावे लागणार आहे. अधिवेशनात सुद्धा मी हीच भूमिका मांडली होती. पण मुख्यमंत्री मिठाचा खडा का टाकता असे म्हणाले होते, पण आता तुम्हीच मुंबईच्या विकासात खडा टाकत आहात, असा टोलाही त्यांनी लगावला.
कांजूर मार्ग ही केंद्राची जागा नसून, ती मुंबई इलाक्याची जागा आहे. त्यामुळे ती राज्याची जागा आहे. कांजूर मार्ग मेट्रो कारशेड हा विषय राजकीय आहे. त्यामुळे कांजूर मार्ग प्रकरणात न्यायालयाने यामध्ये पडू नये, अशी मी विनंती करतो.
– प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष