सातारा – घरासमोर चिकनचे खरकटे टाकण्याच्या कारणावरून तीन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणातून बजरंग लक्ष्मण गावडे (वय 40, रा. मंगळवार पेठ, सातारा) याचा बोगदा परिसरात मंगळवारी (दि. 15) रात्री साडेदहा वाजता चार जणांनी तलवार आणि कोयत्याने निर्घृण खून केला. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी आकाश नितीन बल्लाळ (वय 20), अमन इस्माईल सय्यद (वय 20), तुषार प्रल्हाद धोत्रे (वय 24) व आकाश उदयसिंह शिंदे (वय 24, सर्व रा. समर्थ मंदिर, सातारा) या संशयितांना अटक केली आहे. या घटनेने साताऱ्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आकाश बल्लाळ याच्या घरासमोर तीन वर्षांपूर्वी चिकनचे खरकटे टाकण्यात आल्याच्या कारणावरून आकाश व बजरंग गावडे यांची मारामारी झाली होती. त्यावेळी गावडे याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात गावडेला दोन वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती. या भांडणामुळे आपल्याला भाड्याचे घर सोडून दुसरीकडे राहायला जावे लागले होते, असा समज झाल्याने आकाश बल्लाळ हा गावडेवर चिडून होता. बजरंग गावडे हा बोगदा परिसरातील रस्त्याने काल (दि. 15) रात्री साडेदहाच्या सुमारास घराकडे निघाला होता. त्यावेळी समर्थ कॉर्नर बिल्डिंगसमोर आकाशने गाडी आडवी मारून बजरंगला त्याच्या गाडीवरून पाडले.
त्यावेळी आकाश, अमन सय्यद, तुषार धोत्रे व आकाश शिंदे यांनी बजरंगवर कोयता आणि तलवारीने जोरदार हल्ला केला. बजरंगच्या चेहऱ्यावर व मानेवर खोलवर तब्बल 24 वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये बजरंगचा चेहरा छिन्नविच्छिन्न झाला होता. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. बोगदा परिसरात खून झाल्याचे वृत्त समजताच शहरात खळबळ उडाली. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या.
डीबीच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. हल्लेखोर कोण, ते माहिती नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. गावडेच्या कुटुंबीयांकडे पोलिसांनी चौकशी केली असता, आमचा कोणासोबतही वाद नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने कौशल्याने तपास करत चारही संशयितांना काही तासांतच अटक केली.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार प्रशांत शेवाळे, अविनाश चव्हाण, गणेश घाडगे, अभय साबळे, विशाल धुमाळ, शिवाजी भिसे, गणेश भोंग यांनी ही कारवाई केली.