शंकर दुपारगुडे
कोपरगाव – निवडणुका आल्या की विकास नावाचा जागर सुरू होतो. इतर उमेदवारापेक्षा मी किती सक्षम आहे. माझ्यामध्ये विकास कामे करण्याची किती धमक आहे. मी निवडून आल्याबरोबर किती पटकन काम करू शकतो, अशा आणि अनेक वल्गना उमेदवार मतदारांसमोर करीत असतात. प्रत्येक उमेदवारांच्या बाबतीत मतदारांना असं वाटतं की जणू हे निवडून आल्यानंतर विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारात अविरत वाहतच राहते की काय. पण निवडून आल्यानंतर उमेदवाराची मनस्थिती काय असते हे मतदारांना आता कळू लागले आहे. इतकं असतानाही आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगलेल्या उमेदवारांना वाटते “विकासाचं जाऊ द्या… पण मला आमदार होऊ द्या’ राजकीय पक्ष कोणताही असो, निष्ठा नसली तरी चालेल पण प्रतिष्ठा वाढली पाहिजे. मतदारांना दिलेल्या अभिवचनाकडे कानाडोळा करीत निवडणूक जिंकायची असते.
अपवादात्मक काही उमेदवार स्वतः च्या विचारांच्या पलीकडे जाऊन विकासासाठी धडपड करीत असतात. जनतेच्या मूलभूत समस्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जीवाचं रान हे करीत असतात. पण आशा विकास करणाऱ्या अडथळा आणणे हा सुद्धा आता राजकीय कौशल्याचा भाग झाला आहे.एखादा लोकप्रतिनिधी विकास कामे करत असेल तर त्याचे काम किती चुकीचे आहेत. त्या कामाने नागरिकांचा विकास किती होते किंवा किती होत नाही.
यावर पोटतिडकीने टीकाटिपणी करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम काही उमेदवार, प्रतिनिधी, राजकीय नेते सतत करीत असतात. त्यामुळे होणाऱ्या विकासात खोडा घालण्याचे काम सुरू असते. काही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर इतरांना नावे ठेवण्यात आपला खोडीलापणा दाखवत असतात. मतदारसंघातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे कोणी चांगल्या नजरेने प्रयत्न करीत असतो तर कुणी राजकीय नजरेने प्रयत्न करत असतो. मग काय विकास नावाच्या गप्पा माइक आल्यानंतर मारायच्या. निवडणुकीच्या तोंडावर विकासाचे झरे चोहीबाजूने जुळत जुळत असतात. जनतेचा कळवळा प्रत्येक प्रश्नांची जाण विकास नावावरती रक्त आटेपर्यंत बोलणे, बेरोजगारांना रोजगार, उद्योग, शेती पाणीप्रश्न अनेक समस्या निवडणुकीच्या तोंडावरती सोडविण्यासाठी विजयी उमेदवार पराभूत उमेदवार भविष्यामध्ये विजयी होण्याची आशा धरलेला उमेदवार.
यापूर्वी आणि यापुढेही आपण किती चांगलं काम करू शकतो. हे कौशल्यपणाने मतदारांच्या मनी उतरवण्याचा प्रयत्न आमदार होण्याचे स्वप्न बाळगलेले लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या तोंडावर कौशल्याने करीत असतात. मतदारसंघात विविध कामांचा शुभारंभ, आरोग्य शिबीरे, पाणपोई, शेतकरी मेळावे, कार्यकर्ते, महिला, उद्योग मेळावा, सणसणावली हळदी कुंकु,विविध कार्यक्रमांच्या उधळण सुरू असते. प्रत्यक्ष कृतीमधून किती विकास काम होतात. हे त्यांना आणि त्या परमेश्वरालाच माहीत.
विकासाचं जाऊ द्या, पण मला आमदार होऊ द्या, मी सत्तेत नसल्यामुळे विकास झाला नाही. मी सत्तेत असल्यामुळे विरोधात होतो. अनेक वर्षे इतरांनी सत्ता बघू आता मला सत्ता बघू द्या, अनेकांना आत्तापर्यंत आडकाठी आणली. आता मला एकदा सत्ता द्या, विकासाचा मी खरा शिल्पकार अशी टॅगलाईन आता लोकप्रतिनिधीचा तोंडून ऐकायला मिळते विकासासाठी अनेकांचे राजकीय शैलीतून कारणे वेगळी असतात पण मतदारांना प्रत्यक्षात घवघवीत विकास का दिसत नाही. एखादा लोकप्रतिनिधी भविष्यातल्या अनेक वर्षाचा अंदाज बांधून एखादा प्रश्न कायमस्वरूपी सोडवत असेल तर त्याला विरोधक आडकाठी आणून किती चुकीचं काम करतात हे सिद्ध करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे तेच विरोधक निवडणुकीच्या तोंडावर आम्ही विकास करून दाखवू हे सांगतात. म्हणजेच काय तर विकासाचा जाऊ द्या आणि मला आमदार होऊ द्या.