मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकावरुन राजकारण सुरु झालं आहे. शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या याच ठिकाणी त्यांचे स्मारक करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी दोन गट पडले असून पाठिंबा आणि विरोध करणारा एक गट सध्या राज्यात तयार झाला आहे. दरम्यान, स्मारकावरून राजकारण करू नका, असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला. यानंतर आता मनसेकडूनही या प्रकरणात प्रतिक्रिया आली आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राजकारणासाठी शिवाजी पार्क मैदानाचा बळी देऊ नका अशी विनंतीच केली आहे. संदीप देशपांडे यांनी ट्वीट केलं असून म्हटलं आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासियांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती”.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादर वासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणा पासून वाचवलं आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका ही विनंती.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 8, 2022
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले होते व तेथेच त्यांचे स्मारक उभारण्यात आले. लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यावर मैदानातच स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यांच्या या मागणीला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील विरोध केला आहे.