अकोले – खरेदी करण्यात आलेले टोमॅटोचे बियाणे सदोष निघाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या पिकाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश संबंधित कंपनीला देण्यात यावेत, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने गुलाबराव शेवाळे व महेश नवले यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
सध्या टोमॅटो काढणीचा मोसम जोरात चालू आहे. तालुक्यातील शेतकरी वर्गाने सुधारित टोमॅटो बियाणे खरेदी करून त्याची लागवड केली आहे. उत्पादन शास्त्रशुद्ध पद्धत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे टोमॅटो प्लॉट सुरुवातीला खूप छान होते. निरोगी होते आणि उत्पादित टोमॅटोचा कलर सुद्धा सुंदर होता. मात्र आता या टोमॅटो फळांचा तोडा सुरू झाल्यानंतर बियाणे सदोष असल्याचा प्रकार उघड झाला आहे. तोडा झालेला टोमॅटोचा कलर बदलतो. त्याचबरोबर त्याला काळे ठिपके येतात. त्याचबरोबर ते खाण्यास अयोग्य आहे. शिवाय व्यापाऱ्याला देताना हा माल लूज पडतो, अशी प्रामुख्याने या शेतकऱ्यांची तक्रार आहे.
ज्या कंपन्यांकडून हे बियाणे खरेदी केले गेले होते. त्यांना याबाबत लेखी निवेदन देऊन नुकसानभरपाईची मागणी केली.मात्र संबंधित कंपन्यांनी याची साधी दखल सुद्धा घेतली नसल्याचे सल या सर्व तक्रारदार उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. राहुरी कृषी विद्यापीठ प्रतिनिधी कोळसे व उपविभागीय कृषी अधिकारी बोऱ्हाडे, तालुका पंचायतचे कृषी अधिकारी कोष्टी, अकोले तालुका कृषी प्रतिनिधी दातीर यांना शेतकरी महेशराव नवले, गुलाबराव शेवाळे, स्वप्नील नवले, अमित नवले, विलास भांगरे यांनी निवेदन दिले आहे.