सद्यपरिस्थितीचा मानव्यशास्त्राच्या अंगाने विचार केला असता, भविष्यात भारतातील कुटुंब, शिक्षण यांसारख्या सामाजिक संस्थांमध्ये कोणते बदल होतील याबाबत शक्यता वर्तवणारा हा लेख…
आयटी/तांत्रिक शैक्षणिक अभ्यासक्रमाने जोम धरल्यापासून सर्वच मानव्यशास्त्रे कशी दुय्यम (नोकरी, नावलौकिक मिळवून न देणारी, नोकरीच्या निमित्ताने परदेशवारीची संधी न देणारी) आहेत हा समज लोकांच्या मनात लाटेसारखा रुजायला सुरुवात झाली.
म्हणजेच, साधारणपणे नव्वदचे दशक संपताना आपण सर्वच भारतीयांनी एका कृत्रिम जीवनशैलीला स्वतःला जुंपून घेतले, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. त्यानंतर, जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण या वैश्विक कारभारातदेखील आपण गुंतलो. आर्थिक परिघाखेरीज या संकल्पना आपल्या दैनंदिन व्यवहारांत, आयुष्यात कशा डोकावल्या कळलेही नाही. जीवनशैलीतील बदल, आधुनिक स्थलांतरे आणि विशेषतः अंधानुकरण, देशिक प्रारूपापासून दुरावलेपण या बाबी या काळात अधिकाधिक ठळकपणे अधोरेखित होऊ लागल्या. तसे ते अगदी कालपर्यंत होत होते. नजीकच्या भविष्यात मात्र सामाजिक/मानव्यशास्त्रांचे सुवर्णयुग आपणा सर्वांना खुणावत आहे. त्याची झळाळणारी सोनेरी किनार म्हणजे वर्तमानकाळ अशी सहज सोपी व्याख्या करूयात.
“मानव्यशास्त्रांपासून मानवाने कधीही दुरावू नये’ या मंत्राचे पठण करणे आपण काही काळ थांबवले, किंबहुना, त्याकडे हीन दर्जाचे म्हणून चक्क दुर्लक्ष केले. तसे सुदैवाने झाले असेच आज म्हणावे लागेल. अन्यथा, आज अधोरेखित होत आहे तसे मानव्यशास्त्रांचे महत्त्व कदापि अधोरेखित झाले नसते. ताकदीने वाऱ्यावर स्वार होण्याची पूर्वतयारी जंगी झाली असेच म्हणूयात.
सामाजिक शास्त्रे देखील त्या निमित्ताने व्यापक बनली. इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, लोकप्रशासन, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र ही सारी शास्त्रे आणि त्या अनुषंगाने भाषाभ्यास परस्परपूरक आहेत हे त्या निमित्ताने आपल्याला कळले. आंतरशाखीय अभ्यासाचे महत्त्व देखील ठळक झाले. ही पूर्वतयारीची जमेची बाजू.
प्रामुख्याने, समाजशास्त्राच्या भिंगातून पाहिले असता कुटुंब, शिक्षणसंस्था, प्रसारमाध्यमे आणि धर्म या सामाजिक संस्थांच्या भूमिकेत येणाऱ्या काळात प्रचंड सकारात्मक बदल होतील अशी आशा आणि खात्री वाटते. येणाऱ्या काळात म्हणजे, जागतिकीकरण, जागतिकीकरण उत्तर कालखंड आणि त्यानंतरचा सध्या आपण तोंड देत आहोत तो कोविड19 ने माजवलेला हाहाकार हा एक टप्पा मानला तर त्यानंतरच्या टप्प्यात.
कुटुंब : आपण समाजाकडे ज्या भिंगातून पाहतो, तो भिंग आपल्याला सर्वप्रथम कुटुंब देऊ करते. “संस्कार’ असे त्याचे आपल्या ओळखीचे नाव आहे. इथून पुढच्या टप्प्यात हे संस्कार जात, धर्म, राजकारण या साऱ्यांच्या पल्याडचे असतील, किंबहुना असावेत. काळानेच तशी गरज निर्माण केली आहे. संस्कारांचे हे भिंग आता विस्तारेल आणि त्याचवेळी आत्मकेंद्रितता (स्वार्थ नव्हे) आणील अशी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजेच, एकाचवेळी आपण समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आणि स्वतःचा सर्वोत्तम पालक कसे असतो याचे संस्काररूपी पाठ इथून पुढे सामाजिकीकरण प्रक्रियेअंतर्गत देणे भागच आहे. भावनिक आधाराचा मुद्दाही या निमित्ताने अधोरेखित होतो. भावनिक, मानसिक स्थैर्य, उत्साह टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने कुटुंबाची, कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भूमिका आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कौटुंबिक रचनेवर पुनःश्च विचार होईल, असेही वाटते.
शिक्षण : मी, माझे शिक्षण आणि अर्थार्जनाची संधी इथवर शिक्षण शाखा सीमित असण्याची परिस्थिती आता हळूहळू बदलेल. त्यातही व्यापक बदल होऊन जे शिक्षण आपण घेत आहोत त्यामध्ये “जो जे वांछिल, तो ते लाहो’ चे उत्तम प्रारूप आपण “याचि देहि, याचि डोळा’ अनुभवू शकू. इथे मात्र, अध्यापकांची भूमिका पूर्णतः बदलून ती मार्गदर्शकाची होणे ही काळाची गरज ठरणार आहे. पुस्तकी शिक्षण घेतलेले किंवा विशिष्ठ पठडीतले लोक आणीबाणीच्या जागतिक परिस्थितीत हातावर हात ठेवून बसण्याखेरीज काहीही करू शकत नाहीत, हे आपण अनुभवत आहोत. इथे परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या, नव्हे त्यावर टिच्चून मात करणाऱ्या घरोघरीच्या सैनिकांची आवश्यकता आहे आणि ती पुरी करताना पठडीच्या मर्यादा खुल्या होत आहेत. तशा त्या होत राहतील.
प्रसारमाध्यमे : माहितीचे प्रसारण किंवा माहिती केवळ उपलब्ध करून देणे ही माध्यमांची भूमिका सर्वमान्य आहे. माध्यमांची जबाबदारी देखील अनेकदा अधोरेखित केली जाते. मात्र, आता जबाबदारी देखील न म्हणता, सर्वच सामाजिक माध्यमांनी लोकहिताचे भिंग लावणे हितकारक ठरणार आहे. सदोष माहिती, अनावश्यक माहिती, लोकांच्या मनात दहशत निर्माण करील अशी माहिती चोवीस तास पुरवणे ही भूमिका म्हणता येणार नाही. अशी माहिती घातकच असते हे आता आपल्याला ठळकपणे जाणवत आहे. त्यात संयमी आणि स्थिर चित्तवृत्तीचे दर्शन व्हावयास हवे. जगभरात देशाचे प्रतिनिधित्व करणारी प्रसारमाध्यमे निःस्पृह, वस्तुनिष्ठ होण्याच्या दिशेने प्रयत्न करतील अशी अपेक्षा करूयात. असे केल्यासच त्यांचे अस्तित्व टिकेल हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
धर्म : धर्म म्हणजे खरेतर लोकांना एकजूट ठेवणारी शक्ती, अशी व्याख्या केली जाते. परंतु, त्यात अस्मितांची सरमिसळ झाली की ती व्याख्या नासते, निरुपयोगी होते. धर्म हा खरेतर विशुद्ध रुपात आचरणाशी संबंधित आहे. सद्यस्थितीत वेगवेगळ्या अंगाने “मानवधर्म’ अधोरेखित होत असताना उपरोक्त धर्माची संकल्पनाही व्यापक होईल, विशुद्धरूपाने आपल्या समोर येईल अशी आशा करणे रास्त आहे. संकुचितता जाऊन “धारयति इति धर्मः’ या मूळ भारतीय विचाराच्या दिशेने वाटचाल सुरू होण्यासाठी हा टप्पा म्हणजे अभूतपूर्व संधी आहे.
सरतेशेवटी, “सामाजिक स्थैर्य’ टिकवून ठेवण्याचे काम केवळ राज्यसंस्थेचे नाही. तुमचे, माझे, आपल्या सर्वांचे आहे. त्यासाठी आधी आपण स्वतःला समाजाचा महत्त्वपूर्ण भाग मानणे अत्यावश्यक असते. आपण तसा अविभाज्य भाग आहोत हे स्वतःलाच पटवून देण्याची ही संधी म्हणजे “न भूतो न भविष्यती’ अशीच आहे. साऱ्या वादविवादांच्या पल्याड जाऊन “स्व’च्या उन्नतीवर भर देण्याची हीच ती नव्या जगाची नांदी आहे.
– देवयानी देशपांडे