Lok Sabha Election 2024 – जागावाटपाच्या मुद्द्यावर बिहारमध्ये कॉंग्रेसची स्थिती उत्तर प्रदेशपेक्षाही नाजूक वळणावर पोहोचण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये कॉंग्रेसला लोकसभेच्या किमान १० जागा हव्या आहेत, मात्र राष्ट्रीय जनता दल त्यांना ६ पेक्षा एकही जास्तीची जागा देण्यास तयार नाही.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार अशी कोंडी आता निर्माण झाली आहे की राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी आता कॉंग्रेसला न विचारताच पुढची पाउले उचलण्यास सुरूवात केली आहे. सगळ्यांत महत्वाचे म्हणजे पहिल्या टप्प्यात ज्या औरंगाबादच्या जागेवर अनेक वर्षांपासून कॉंग्रेसचा अधिकार होता तेथील उमेदवाराची घोषणाही लालू यादव यांनी केली आहे.
राष्ट्रीय जनता दलाच्या या कृतीमुळे कॉंग्रेसचे नेते दुखावले आहेत. त्यांनी लालूंना थेट आणि स्पष्ट संदेश पाठवला आहे की आम्ही १० पेक्षा एकही जागा कमी घेणार नाही. दोन्ही पक्षांतील तणाव शिगेला पोहोचला असला तरी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश सिंह मात्र आशावादी आहेत. लवकरच काही मार्ग काढला जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
पहिल्या टप्प्यात बिहारच्या गया, नवादा, औरंगाबाद आणि जमई या चार जागांसाठी मतदान होणार आहे. गेल्या वेळेच्या म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला ९ जागा सोडण्यात आल्या होत्या. नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आता आघाडीतून बाहेर पडल्यानंतर कॉंग्रेसच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना किमान १२ किंवा १३ जागा हव्या आहेत.
किमान दहा जागा मिळाल्याच पाहिजे अशी कॉंग्रेसची मागणी आहे. लालू यादव यांनी सुरूवातीच्या टप्प्यात कॉंग्रेसला होकार किंवा नकारही दिला नाही. आता जशी निवडणुकीची वेळ जवळ आली आहे त्यांनी दुर्लक्ष करण्यास सुरूवात केली आहे. त्यातही जास्तीत जास्त ६ जागा दिल्या जाऊ शकतात असा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे समजते. त्यामुळे कॉंग्रेसच्या बिहारमधील नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे.
कॉंग्रेसची दुसरी अडचण अशी आहे की ज्या जागा त्यांना देऊ केल्या आहेत त्या जिंकणे कठीण काम आहे. या जागांवर कॉंग्रेसच्या तुलनेत राजदची स्थिती चांगली आहे. याउलट कॉंग्रेसकडे प्रबळ उमेदवारही नाहीत. राष्ट्रीय जनता दलाच्या संसदीय मंडळाने कालच लालू यादव यांना निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार दिले आहेत.