2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिणेकडील राज्यांमध्ये एकूण 128 जागा आहेत आणि त्यापैकी भाजपाकडे सध्या केवळ 29 जागा आहे. त्यामुळे भाजपने आता दक्षिणायन सुरू केले असल्याचे राजकीय जाणकार मानतात.
गेल्या आठवड्यात भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. या पक्षाला गळती लागल्याचे कर्नाटकातील चित्र होते. त्याचवेळी दक्षिणेकडच्या अन्य राज्यांत मात्र काही मंडळींनी भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजपमध्ये दाखल झालेली मंडळी आता तशी फारशी मोठी नाहीत. त्यांनी राजकारणात कोणता चमत्कार करून दाखवलेला नाही. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या लोकांचे अस्तित्वही कोणाच्या गावी नव्हते. आता त्यांच्या पक्षप्रवेशामुळे बराच गाजावाजा मात्र झाला आहे. तो त्यांना जेवढा फायद्याचा आहे तेवढाच किंबहुना काकणभर अधिक भाजपच्या फायद्याचा आहे. त्याचे कारण भाजप दक्षिण भारतात काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी घेऊन पुढे जातो आहे.
काही दिवसांपूर्वी अनिल अँटनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एरव्ही या नावाला कोणी फार महत्त्व देण्याचे कारण नव्हते. माध्यमांनीही तिकडे दुर्लक्षच केले असते. अनिल कोणी मुख्यमंत्री, मंत्री अथवा माजी मंत्री नाहीत. आमदार-खासदारही नाहीत. पण गेले चार दिवस त्यांनी प्रसारमाध्यमांमधील बरीच जागा आणि वेळ व्यापला त्याचे कारण त्यांचे कुटुंब. अनिल हे ए. के. अँटनी यांचे पुत्र आहेत. ए. के. अँटनी कॉंग्रेसचे अतिदिग्गज नेते. केरळचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री. अत्यंत सच्चा माणूस. कोणताही भ्रष्टाचार नाही, आरोप नाही. सचोटीने आणि नीतीने चालणारे व्यक्तिमत्त्व. कॉंग्रेसच्या मधल्या फळीतील प्रमुख मात्र तरीही लो प्रोफाइल चेहरा. कोणत्या राज्यात अथवा निवडणुकीत कॉंग्रेसला फटका बसला, की अभ्यास करायला एक समिती नेमली जाते. अशा समितीचे काम तटस्थपणे विश्लेषण करून तो अहवाल पक्ष नेतृत्वाकडे सोपवणे असते. ते काम बहुतेक वेळा अँटनी यांच्याकडे सोपवले जायचे.
काही विशिष्ट बाबींत पक्षाचे धोरण अथवा भूमिका ठरवण्यापूर्वी त्याचा अभ्यास करून मग पक्षाला त्याची शिफारस करण्याचे कामही त्यांनी अनेक वेळा केले. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हेही अशा किमान एक शेकडा कमिटींचे अध्यक्ष असायचे. यावरून अँटनी यांचे पक्षातील महत्त्व लक्षात येऊ शकते. त्यांचा मुलगा कधीच राजकीय पटलावर नव्हता. पण मोठ्या नेत्याच्या मुलाला जे नैसर्गिक वलय प्राप्त होते तसे ते अनिल यांना प्राप्त झाले. अनिल यांच्या भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेसचे नुकसान झाले नसेल असे कॉंग्रेसींनी म्हणणे आत्मवंचना. त्याचे कारण अनिल हे ए. के. अँटनी यांचे पुत्र आहेत व त्यांच्या जाण्याने केरळमध्ये भाजपला काय संदेश द्यायचा तो दिला गेला आहे.
भाजपला गेल्या आठवड्यात सी. आर. केशवन यांच्या रूपाने आणखी एक नवा चेहरा मिळाला. केशवन हे माजी कॉंग्रेस नेते सी. राजगापोलाचारी यांचे पणतू. राजगोपालाचारी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. त्यांचे कॉंग्रेसमधील स्थान आणि महत्त्व समजण्यासाठी एवढे पुरेसे आहे.
केशवन यांनी कॉंग्रेस पक्षावर टीका करण्याचे टाळले आहे. पण नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीमुळे प्रभावित झाल्याचे विशेषत: प्रधानमंत्री आवास योजनेचे फायदे त्यांनी सांगितले. आपल्या कुटुंबातील अनेकांना पक्की घरे या योजनेमुळे मिळाली. एकूण 3 कोटी घरे बांधण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. केशवन यांचे नाव तोपर्यंत देशाच्याच काय तमिळनाडूच्या राजकारणातही फारसे परिचित नसावे. आता भाजपप्रवेशामुळे पुन्हा राजगोपालाचारींचे स्मरण लोकांना करून देण्यात आले.
अखंड आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसचे सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या पश्चात त्यांचे पुत्र जगनमोहन रेड्डी यांना मुख्यमंत्रिपद हवे होते. मात्र, कॉंग्रेसला दिल्लीबाहेर अशी घराणेशाही चालत नाही. त्यांनी किरण रेड्डी यांना आंध्र प्रदेश सोपवले. पुढे काय झाले ते सगळ्यांना ज्ञात आहे. राज्याचे विभाजन झाले व आता जगनमोहन विभाजित आंध्रचे मुख्यमंत्री झाले. कॉंग्रेस आंध्रमधून जवळपास हद्दपार झाली आहे. आता आंध्रमधील काही चित्रपट कलाकारांवरही भाजपची नजर आहे.
लोकसभा 2024 तोंडावर असताना हे सगळे होते आहे. भाजप सत्तेतून जाणार असा दावा ठामपणे कोणी केलेला नाही. तथापि, जागा कमी होणार असे भाकित बऱ्याच जणांनी केले आहे व ते खरे ठरण्याची शक्यताही आहे. हे भाकित करणाऱ्यांतील एक प्रमुख नाव शशी थरूर यांचे आहे. थरूर यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींच्या विरोधात जाऊन कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. गुलाम नबी आझाद म्हणतात, की कॉंग्रेसमध्ये कणाहीन बनून राहावे लागते. तसे थरूर यांच्या प्रकृतीला मानवणारे नाही. त्यांनी आपल्या वर्तणुकीतून आणि स्पष्ट भूमिकेतून वारंवार सिद्ध केले असल्यामुळे तेही कुंपणावर बसल्याचे मानले जाते. त्याहीपुढे भाजपची त्यांच्यावर नजर आहे. जर थरूर यांनी तिकडे उडी घेतली तर भाजपाचे ते सगळ्यात मोठे यश असेल, त्याचे कारण त्यांना केरळमध्ये लोकांना दाखवण्यासाठी एक चेहरा मिळेल. या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जवळपास दोन दशकांपासून काम करतोय असे म्हणतात. भाजपला तेथे खाते उघडता आलेले नाही. मेट्रो मॅन ई श्रीधरन यांना चेहरा म्हणून पुढे केल्यावरही पक्षाला जागा मिळाल्या नाहीत, खुद्द श्रीधरन यांचाही पराभव झाला. अशात ग्लॅमर असलेले थरूर आणि अनिल अँटनी भाजपसाठी कमाल करू शकतात, असे त्यांचे गणित असावे.
भाजपला उत्तर पट्ट्यात किंवा हिंदी भाषिक प्रदेशात गेल्या वेळेच्या कामगिरीची पुनरावृत्ती करता येणार नाही. महाराष्ट्रातही म्हणजे खासदारांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावरच्या राज्यातही भाजपला वातावरण अनुकूल नाही. पश्चिम बंगालमध्ये तशीच स्थिती आहे व बिहारमध्ये नितीशकुमार त्यांच्या समवेत नाही. त्याकरताच भाजपने आता दक्षिणायन सुरू केले असल्याचे राजकीय जाणकार मानतात. त्याचे कारण दक्षिण भारतात आंध्र प्रदेशात लोकसभेच्या (25), कर्नाटकात (28), केरळमध्ये (19), तेलंगणा (17). तमिळनाडू (39) अशा साधारण 128 जागा आहेत.
भाजपकडे यातील केवळ 29 जागा आहेत. त्याही कर्नाटक आणि तेलंगणामध्ये. अन्य राज्यांत भाजपची पाटी कोरी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सध्याचे संख्याबळ कायम ठेवायचे असेल तर भाजपला इतर राज्यांतील पडझड भरून काढण्यासाठी या 128 जागा महत्त्वाच्या आहेत. त्यादृष्टीने अर्थातच त्यांनी तयारी केली होती. भाजप आणि संघाचा कथित हिंदुत्वाचा अजेंडा येथे आतापर्यंत कर्नाटकचा अपवाद वगळता फारसा यशस्वी झालेला नाही. त्याला तसे यश मिळण्याचीही त्या त्या राज्यांची ऐतिहासिक आणि वर्तमानातील पार्श्वभूमी पाहता शक्यता नाही. म्हणूनच माध्यमांतून जागा व्यापणारे चेहरे भाजपला हवे आहेत व त्यातूनही दक्षिणायन सुरू झाल्याचे म्हटले जाऊ शकते.
आकाश वशिष्ठ