पुणे -अबालवृद्धांबरोबरच सर्वच क्षेत्रे करोनातून सावरली असताना, जगभरात डंका असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या महामारीच्या संकटातून अद्यापही सावरले नाही. विद्यापीठातील शैक्षणिक सत्रांबरोबरच अन्य कामकाजांचेही वेळापत्रक अद्याप पूर्वपदावर येऊ शकलेले नाही. त्यामुळे याचा विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि निकालांवर परिणाम होत आहे. दरम्यान, विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी समिती नेमन्यात आली आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे विस्कळीत झालेले वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या 1 ऑगस्टपासून शैक्षणिक सत्र सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाने सोमवारी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्याद्वारे शैक्षणिक वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे. विद्यापीठाची सोमवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. त्यात करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक सत्र जून-जुलैमध्ये सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण विद्यापीठाच्या द्वितीय सत्राची परीक्षा जूनपासून सुरू होणार आहेत. त्यानंतर ऑगस्ट-नोव्हेंबरमध्ये शैक्षणिक सत्र सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच निकालाला विलंब होऊ नये, यासाठी विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता विद्यापीठाने यंदाचे शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्टपासून सुरू करण्याच्या नियोजनासाठी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र ऑगस्टमध्ये सुरू होण्याची चिन्हे आहेत.
मार्च महिन्यात झालेल्या अधिसभेत परीक्षेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी परीक्षा विषयक कामकाजाचा निपटारा होण्याच्या दृष्टीने डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. यांच्याकडून नव्याने स्थापन करण्यात आलेल्या समितीला सूचना करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. महाविद्यालयीन स्तरावर विविध कारणांनी भेटी देणाऱ्या विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीमध्ये पात्र असणाऱ्या सर्व घटकांचा सहभाग करण्याकरीता धोरण राबविण्यासाठी प्राचार्य डॉ. घोरपडे नितीन लक्ष्मण यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सव आयोजन करण्यासाठी आणि “जी 20′ परिषदेच्या अनुशंगाने विद्यापीठात कार्यक्रम आयोजन करण्याकरीता समिती नेमण्यात आली, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.